पुणे, दि. २० :
सॉफ्टझील टेक्नॉलॉजीचे मार्केटिंग तंत्र वाखाणण्याजोगे – छत्रपती मालोजीराजे
भारतातल्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
सॉफ्टझील टेक्नॉलॉजी कंपनीने भव्य रोजगार मेळावा घेण्यात पुढाकार घेऊन मोठे काम केले आहे. यामुळे कामाच्या शोधात असलेल्या अनेकांना काम मिळण्यास मदत होणार आहे. सॉफ्टझीलने सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग तंत्र वापरले, हे वाखाणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव छत्रपती मालोजीराजे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, सॉफ्टझील टेक्नॉलॉजी यांच्या वतीने ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याचे उदघाटन ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहाय्यक संचालिका अनुपमा पवार, सोसायटीचे सचिव सुरेश शिंदे, जिल्हा कौशल्य विकासाचे उपसंचालक शरद अंगणे, सॉफ्टझील टेक्नॉलॉजीचे संचालक दौलत बाफना, कौशल्य विकास अधिकारी महेश गवळी, तसेच विविध कंपन्यांचे ३०० हून अधिक एच आर आदी मान्यवर उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यात १४६ कंपन्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे २६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असताना तब्बल ५० हजाराहून अधिक विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते. या अनुशंगाने हा भारतातला सर्वात मोठा रोजगार मेळावा ठरला आहे.
यावेळी छत्रपती मालोजीराजे म्हणाले, आज रोजगाराची समस्या गंभीर आहे. शासन सर्वच गोष्टी एकटे करू शकत नाही. समाजातील उद्योगपती, कंपन्या याना बरोबर घेऊन शासन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करीत असते. मार्केटिंग, संधी आणि रोजगारांच्या संख्येत समतोल निर्माण होणे गरजेचे आहे. असमतोल निर्माण झाल्यास अनेक प्रश्न निर्माण होतील. महाराष्ट्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, कौशल्य विकसित केलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. २०३० पर्यंत भारत जगातली सर्वात मोठी तिसरी आर्थिक महासत्ता बनणार आहे. आर्थिकदृष्ट्या भारत पुढे जातोय, हि स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरी, व्यवसायात स्थिरस्थावर झाले पाहिजे. आज अनेक संधी आहेत. त्यामुळे असे रोजगार मेळावे शैक्षणिक संस्थांनी राबविणे गरजेचे आहे. आम्ही दरवर्षी विविध सामाजिक घटकांना एकत्र घेत रोजगार मेळावे आयोजित करणार आहोत, असेही छत्रपती मालोजीराजे यांनी सांगितले.
सॉफ्टझील टेक्नॉलॉजीचे संचालक दौलत बाफना यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कंपन्यांकडे कामासाठी नोंदणी केली पाहिजे. सध्याच्या ओपनिंग ट्रेंडचा अभ्यास करणेही गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी फक्त पदवी प्राप्त ना करता त्यासोबत कौशल्य आत्मसात केले, तरच इथून पुढच्या काळात त्यांना काम मिळणार आहे. कौशल्य विकसित केल्यास रोजगार नक्की मिळेल. त्यामुळे इथून पुढे पुस्तकी शिक्षणापेक्षा कौशल्याधारित शिक्षणाची आवश्यकता आहे. बाहेरच्या जगाचा अनुभव आवश्यक आहे.
अनुपमा पवार म्हणाल्या, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र २००७-०८ पासून रोजगार मेळावे आयोजित करते. मात्र, हा रोजगार मेळावा उल्लेखनीय आहे. बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने असे मेळावे आवश्यक आहेत.
शरद अंगने म्हणाले, रोजगार, स्वयंरोजगारातून आर्थिक प्रगती शक्य आहे. हा रोजगार मेळावा भारतातला सर्वात मोठा रोजगार मेळावा म्हणता येईल. खरे तर या मेळाव्याला करिअर मार्गदर्शन म्हणता येईल. सध्याच्या तरुणाईला नाविन्याचा ध्यास लागला आहे. शासनाच्या स्टार्ट अप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी केले.