मुंबई : योग एक प्रकारची ऊर्जा आहे. योगाच्या विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक आरोग्याबरोबरच चांगुलपणाची भावना निर्माण होते. योग मानवी मनशक्तीला गतिमान करतो. बौद्धिक पातळी सुधारते आणि भावनांना स्थिर ठेवून उच्च पातळीच्या एकाग्रतेमध्ये वाढ करण्यास मदत करते, असे ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
डोंगरी येथील निरीक्षण गृह, बालगृहातील मुलींसोबत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग साधना केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
श्रीमती मुंडे म्हणाल्या, 21 जून रोजी संपूर्ण जगात योग दिन साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात केली असून योग ही भारताची हजारो वर्षापासूनची परंपरा आहे. नित्य योग साधना केल्याने शरीर निरोगी राहते. बाल वयापासूनच योग केल्यास त्याचा अधिक प्रमाणात लाभ मिळतो, त्यामुळे बालगृहात येऊन बालकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यासोबत योग साधना करुन आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.