मुंबई-लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर अातापर्यंत ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अायाेगाकडून देण्यात आली.
ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनरसंदर्भातील आहेत. संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशाचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास ‘सी व्हिजिल’ ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ॲपवर टाकू शकतात. अॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सी व्हिजिल मोबाइल ॲप हे डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲपवर तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होते. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होतो. मतदारांना पैसा, मद्य, अमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेक न्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिताभंगाच्या प्रकरणात ॲपवर तक्रार करता येते .
सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून, तर सर्वात कमी धुळे, जालन्यातून
अॅपवरील सर्वाधिक १३३ तक्रारी पुणे जिल्ह्यातून निवडणूक आयाेगाकडे दाखल करण्यात आल्या आहेत. त्या खालोखाल ठाणे ६८, सोलापूर ६१, मुंबई उपनगर ४५, तर मुंबई शहर येथे ४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात ३६, अहमदनगर ३५, अकोला ११, अमरावती ११, औरंगाबाद १२, बीड ८, भंडारा २, बुलडाणा १३, चंद्रपूर ३, धुळे २, गडचिरोली २, गोंदिया ३, हिंगोली ७, जळगाव २०, जालना १, कोल्हापूर १८, लातूर ११, नागपूर ३०, नंदुरबार २, नाशिक २२, उस्मानाबाद ८, पालघर २४, परभणी ७, रायगड ८, रत्नागिरी ४, सांगली १७, सातारा ११, सिंधुदुर्ग १९, वर्धा १४, वाशिम ६, तर यवतमाळ जिल्ह्यातून २ तक्रारी नोंदवण्यात आल्याचे अायाेगाकडून सांगण्यात अाले.