पुणे- कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने वेगवेगळ्या जाती-जमाती, भिन्न धर्मीय किंवा भिन्न भाषिक यांच्यामध्ये मतभेद वाढतील किंवा जातीय वैमनस्य निर्माण होईल, अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्यामध्ये भाग घेवू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सी-व्हीजील या अॅपबाबतही विस्तृत माहिती दिली. निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील त्रूटी दूर करण्यासाठी या ‘सी-व्हिजिल’ ॲपची निर्मिती भारत निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे. ‘सी-व्हिजिल’ हे ॲप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नावीन्यपूर्ण अस्त्र ठरणार आहे. कोणताही नागरिक या अॅपचा वापर करु शकतो. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात, असेही ते म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे सांगून मेळावे, जाहीर सभा याबाबतीत आवश्यक त्या परवानग्या घेण्यात याव्या,असे सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी राम यांनी आचार संहितेच्या काळात काय करावे आणि काय करु नये, याबाबत विस्तृत सादरीकरण केले. उपस्थितांच्या प्रश्नांचीही समाधानकारक उत्तरे दिली. निवडणूक खर्च व्यवस्थापन या विषयावर अजित रेळेकर, एक खिडकी योजनेबाबत सुहास मापारी, टपाली मतपत्रिकेबाबत सुनील गाढे यांनी सादरीकरण करुन शंकानिरसन केले.