पुणे :- शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून घेतली.
हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या www.twitter.com/Dev_Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर तसेच www.facebook.com/devendra.fadnavis या फेसबुक पेजवर आणि www.youtube.com/DevendraFadnavis या युट्यूब चॅनलसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे ट्विटरwww.twitter.com/MahaDGIPR व www.facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेजसहwww.youtube.com/maharashtradgipr या युट्यूब चॅनलवर मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपद्वारे दाखवण्यात आला. त्याशिवाय http://elearning.parthinfotech.in/ या लिंकवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, फळबागा, कांदा चाळ, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण,स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अन्न प्रक्रिया, शेडनेट, पॉली हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांबाबत सातत्याने आढावा घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधताना, विविध जिल्हयातील लाभार्थ्यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा मिळालेल्या लाभाबद्दल मुख्यमंत्र्यांशी संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांच्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनांमुळे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगतानाच कृषि विभागाच्या योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असल्यामुळे त्याचा फायदा मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना झाल्याची भावना यावेळी व्यक्त लाभार्थ्यांनी केली.
महाराष्ट्र ॲग्रीटेक कार्यक्रमाची सुरुवात
शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि पेरणीपासून ते कापणीपर्यतचा डेटा तयार करण्यासाठी इस्त्रो आणि एमआरसॅट यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ॲग्रीटेक कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लोकसंवाद कार्यक्रमानंतर करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि शेती सुजलाम सुफलाम होण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.