पुणे- श्री संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 723 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी कार्तिकी यात्रा संपन्न होणार आहे. या यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रेबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सहायक पोलीस आयुक्त निलीमा जाधव, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, उप विभागीय अधिकारी ज्योती कदम, अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, खेडच्या तहसिलदार सुचित्रा आमले, आळंदी नगर पालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अॅड. विकास ढगे पाटील, अभय टिळक, ज्ञानेश्वर वीर, सुरेश देशमुख, मारुती कोकाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आळंदी कार्तिकी यात्रा 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळात होणार असून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी राम यांनी विस्तृत आढावा घेतला. कोणत्याही यात्रा, सोहळ्याचे नियोजन करतांना सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष रहायला हवे. परस्पर समन्वय राहण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला एक नोडल अधिकारी नेमावा, त्यांचे संपर्क क्रमांक देण्यात यावेत. तसेच आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. टँकरने पाणीपुरवठा, वारक-यांसाठी रॉकेल, गॅस, धान्य उपलब्ध करणे, अतिक्रमणे काढणे, तीर्थक्षेत्रातील प्रमुख भागांमध्ये विद्युत व्यवस्था, पालखी तळावरील स्वच्छता आणि सपाटीकरण, तात्पुरती शौचालये, रुग्णवाहिका, औषधे यांची उपलब्धता, अग्निशामक व्यवस्था आदींबाबतही त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. आळंदी येथे कार्तिकी एकादशीनिमित्त होणा-या यात्रा सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. भाविकांच्या सुविधांबाबत दरवर्षीप्रमाणे प्रशासनाच्या सर्व विभागाच्या यंत्रणांनी दक्ष रहावे, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.