पुणे – राज्यातील तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम उद्योग विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची अभिनव संकल्पना राज्य सरकारने सुरू केली आहे. रोजगार मेळावा हा फक्त ‘सोहळा’ नसून शासनाची ती ‘बांधिलकी’ असल्याचे सांगत या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी मागणारा आणि देणारा यांच्यात सांगड घालण्याचे काम शासन करत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले.
राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि सी.आय.आय.च्यावतीने उरळी देवाची जि. पुणे येथे आयोजित पहिल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे विशाल चोरडीया, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सी. आय. आय.चे महाव्यवस्थापक आशिष केशरवानी उपस्थित होते.
उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, राज्यातील उद्योगवाढी बरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम उद्योग विभागाचे आहे. राज्यात उद्योगांची संख्या वाढली की त्यांना काम करणाऱ्या कुशल कामगारांचीही गरज असते, असे कुशल कामगार या मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांना मिळणार आहेत. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी पहिल्याच आठवड्यात 8 हजार 800 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. तर दोन ते तीन हजार नव्या उमेदवारांनी आज प्रत्यक्ष नोंदणी केली आहे. हा पहिलाच मेळावा अत्यंत यशस्वी झाला आहे. याच प्रकारचे मेळावे राज्यभर घेण्यात येणार आहेत. यासाठी एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करून या मेळाव्याच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या उमेदवारांना नोकरी मिळेपर्यंत त्याचा पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, तरुणांच्या हाती ताकद आहे, बुद्धी आहे, परंतु रोजगार नसल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत या रोजगार मेळाव्याला मोठे महत्व आहे. राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मेळावा आहे. एका युवकाला रोजगार मिळाला की त्याचे संपुर्ण कुटुंब उभे राहते. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, विकासाच्या कामात प्रशिक्षीत मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना काम मिळणार आहे. रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराला या माध्यमातून चालना मिळणार आहे. गुंजवणी धरणाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. पुरंदर विमानतळामुळे पुरंदर हा सर्वात वेगाने विकसित होत असलेला तालुकाअसल्याचे त्यांनी सांगितले.
श्री आदित्य ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा ही राज्य शासनाची अत्यंत उपयुक्त संकल्पना आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील तरुणाईच्या हाताला त्याच्या योग्यतेचे काम मिळणार आहे. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी या मेळाव्याचा मोठा उपयोग होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत तरुणांनी जिद्द आणि चिकाटी सोडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. तर आभार विश्वनाथ राजाळे यांनी मानले. मेळाव्याला हजारो तरुण-तरुणींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये
- या मेळाव्यासाठी एकूण १० हजार ६८० उमेदवारांची ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी.
- मेळाव्यामध्ये ४ हजार ३०० उमेदवारांची उपस्थिती.
- मेळाव्यात १ हजार ८९० उमेदवारांना नियुक्ती पत्र.
- नोंदणी झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळवून देण्याच्या पाठपुराव्यासाठी उद्योग विभाग स्वतंत्र कक्ष उभारणार.
- देशातील नामवंत ६० हून अधिक कंपन्यांची मेळाव्यात हजेरी.
- स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी स्वतंत्र दालन.
- स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन.
- योग्य नियोजनामुळे मेळाव्यासाठी उपस्थित उमेदवार आणि पालक यांच्यात समाधान.
- पालक आणि उमेदवारांच्यात मोठा उत्साह.
मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रीया-
मेळाव्याला आल्याचे सार्थक झाले…
मी माजी सैनिक आहे. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर कुटुंबाची काळजी घेत, घराच्या जवळ दुसरी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील होतो. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची माहिती मिळाली, त्यानुसार मी नोकरीसाठी मेळाव्यात नाव नोंदविले. सैन्य दलातील माझ्या कामाचा अनुभव पाहून मला तात्काळ या ठिकाणी नोकरी मिळाली. मला लगेचच जॉईनिंग लेटर ही मिळाले. या मेळाव्याला आल्याचे सार्थक झाले, मी शासनाचा मनापासून आभारी आहे.
– आबासाहेब चौधरी रा. फुरसुंगी, पुणे.
मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळाली!
कराड तालुक्यातील छोट्या खेड्यातील मी मुलगा आहे. मी सीएनजी ऑपरेटर आहे. मी कामाच्या शोधात होतो. नोकरीसाठी मी अनेक ठिकाणी जावून आलो परंतू मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळत नव्हती. बाळासाहेब ठाकरे मेळाव्यात मी आलो आणि मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळाली. या ठिकाणी मला थेट जॉईनिंग लेटरच मिळाले, त्यामुळे मी खूप खूश असून शासनाचा आभारी आहे.
– राहूल आनंदराव खबाले,रा. विंग, ता. कराड, जि. सातारा.
नोकरी मिळाल्याचा मोठा आनंद!
बाळासाहेब ठाकरे मेळाव्याची माहिती मला मिळाल्यानंतर या ठिकाणी मी नोकरीसाठी नावाची नोंदणी केली. एकाच ठिकाणी एवढ्या कंपन्या आल्यामुळे नोकरी नक्की मिळेल अशी आशा होती. मात्र लगेच आजच हातात कॉल लेटर मिळेल असे वाटले नव्हते. मात्र या रोजगार मेळाव्यामुळे हे शक्य झाले. नोकरी मिळाल्याचा मला मोठा आनंद असून शासनाचा मी खूप-खूप आभारी आहे.
– प्रसाद सुनिल मेमाणे ,रा. पारगाव, ता. पुरंदर, जि. पुणे.
लगेच नोकरी मिळेल असे वाटलेच नव्हते…
दौंड तालुक्यातले लोणारवाडी हे माझ गाव आहे. मात्र मी पुरंदर तालुक्यातल्या माझ्या काकांच्या गावात शिक्षण पूर्ण केले. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्या विषयी माहिती मला मिळाल्यावर मी सहजच नोकरीसाठी माझ्या नावाची नोंदणी केली. एवढी मुल इथ दिसल्यावर मला नोकरी मिळेल का? अशी शंका होती, मात्र अगदी सहजच मला नोकरी मिळाली, कॉल लेटर हातात घेतल्यावर सुध्दा एवढ्या सहज नोकरी मिळाली आहे, असं वाटतच नाही. मी शासनाचा आभारी आहे.
– अक्षय गाढवे ,रा. लोणारवाडी, ता. दौंड, जि. पुणे.
खुपच चांगले उमेदवार आम्हाला मिळाले
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात आमची आयएसटीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सहभागी झाली होती. या निमित्ताने अनेक होतकरू, हुशार उमेदवार आम्हाला मिळाले आहेत. आमच्याकडे आलेल्या अर्जातील मुलांच्या पात्रतेनुसार आम्ही त्यांना नोकरी देणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने कुशल उमेदवार आम्हाला मिळणार आहेत, या रोजगार मेळाव्याचा उमेदवारांबरोरच कंपन्यांनाही चांगला फायदा झाला आहे.- मनिषा मोहिते ( आयएसटीसी प्रा. लि. कंपनी. प्रतिनीधी रा. खराडी, पुणे. )