पुणे,दि. 15: एम.आय.डी.सी हिंजवडी परिसरातील रस्त्यांची तसेच हिंजवडी-म्हाळुंगे दरम्यानच्या मुळा नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी करून, सद्यस्थितीचा आढावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज घेतला. हिंजवडी परिसरातील वाहतूक व्यवस्था जलद, सुरक्षित होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना पालकमंत्री बापट यांनी संबंधितांना दिल्या.
वाहतूक व्यवस्था जलद, सुरक्षित होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतीने करा. हिंजवडी परिसरातील वाहतुकीचा, कचऱ्याचा प्रश्न ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच एमआयडीसी क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन समन्वयाने लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे प्रतिपादन हिंजवडी इंडस्ट्रीज असोशिएशन तसेच एमआईडीसीच्या वतीने आयोजित बैठकीत राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथील सभागृहात केले.
बैठकीस जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते, वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे,आ.लक्ष्मण जगताप एमआईडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या, एमआयडीसी संदर्भातील समस्या पीएमआरडीए च्या टाउन प्लॅनिंग स्कीम मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक तसेच पार्किंगचे 75 टक्के प्रश्न सुटतील. शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या हिताचा विचार करूनच सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी माहिती श्री.बापट यांनी यावेळी दिली.