पुणे : गेल्या काही दिवसात माध्यमांचे स्वरुप झपाट्याने बदलत आहे. पारंपारिक माध्यमांनामागे टाकून सोशल मिडीया प्रभावी होत आहे. त्यामुळे सध्याच्या पत्रकारांनी तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करून नवनवी आव्हाने स्विकारली पाहिजेत, असा सूर “पत्रकारितेचे बदलते स्वरुप आणि आव्हाने” या चर्चासत्रात व्यक्त झाला.
विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय पुणे तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील सहकार आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार कार्यशाळेतील “पत्रकारितेचे बदलते स्वरुप आणि आव्हाने” या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चचासत्रात दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, सहारा समय वाहिनीच्या ब्यूरो चीफ प्रतिभा चंद्रन अय्यर, आज तकचे विशेष संवाददाता पंकज खेळकर सहभागी झाले होते. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, प्र. जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील उपस्थित होत्या.
यावेळी नंदकुमार सुतार म्हणाले, सोशल मिडीया हा माध्यमांचा महास्फोट आहे. तंत्रज्ञानामुळे माध्यमांमध्ये मोठे बदल होत आहेत. पारंपारिक माध्यमांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सोशल मिडीयाने सामान्य लोकांना पत्रकार केले आहे. सोशल मिडीया हा पारंपारिक माध्यमांवर प्रभावी ठरत आहे. मात्र यातून नकारात्मक पत्रकारिता समोर येत असून विकास पत्रकारिता करण्याची गरज आहे. आपल्या माध्यमांमध्ये स्थितीस्थापकत्वाचा दोष असून तो नव्या पिढीच्या पत्रकारांनी दूर करण्याची गरज आहे. नवमाध्यमांमुळे तरुण पिढीला अमर्याद संधी उपलब्ध होत असून त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.
प्रतिभा चंद्रन अय्यर म्हणाल्या, नव्या तंत्रज्ञानामुळे आजच्या काळात पत्रकारांच्या हातात माहितीचा खजिना आला आहे. मात्र गुगल, विकीपीडायामुळे आपल्याला माणूस वाचता येत नाही, त्यासाठी समाजात मिसळावेच लागते. माहितीचा महाजाल ही एक शुष्क गोष्ट आहे, आजच्या पत्रकारांनी त्याचा वापर करावा, मात्र त्यावर अवलंबून राहू नये. माध्यमांच्या बदलत्या प्रवाहात पत्रकारांनी बदल स्विकारले पाहिजेत.
पंकज खेळकर म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाने आता काम सोपे झाले आहे, पूर्वीपेक्षा अधिक संधी पत्रकारांना उपलब्ध आहे. मात्र आता स्पर्धा वाढली आहे, या वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करुन नव्या आव्हानांचा स्विकार करण्याची वृत्ती पत्रकारांनी अंगी बाणली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या चर्चासत्राला विविध माध्यमांचे पत्रकार, पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.