गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. कोकण किनारपट्टीवर या उन्हामुळे मोठा त्रासही जाणवू लागला आहे. उन्हाळ्यात शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. कोकणात उन्हाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उन्हाळ्यामध्ये तीव्र उष्णतेमुळे उष्माघात होऊ शकतो तो जीवाला धोकादायकही ठरू शकतो. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात याव्यात. उष्माघातामुळे शरीराने मर्यादेपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतली किंवा निर्माण केली की हायपरथर्मिया होतो. उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे.
काय करावे…
तहान लागलेली नसली तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/हॅट, बुट व चप्पलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, आंबील, लिंबुपाणी, ताक इत्यादीचा वापर करण्यात यावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे, घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा. जर गरोदर वा आजारी असाल तर अधिकची काळजी घेण्यात यावी. शरीराचे तापमान वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
काय करू नये
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या वा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे, गडद, घट्ट जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.
कुठलाही आजार होण्यापूर्वी बचावात्मक उपाय अधिक फायद्याचे ठरतात. उष्माघाताच्या बाबतीतही अशीच काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे; परंतु कडक उन्हात बाहेर पडणे गरजेचे असेल तर सोबत छत्री घ्यावी किंवा टोपी घालावी. थोडक्यात डोके झाकून घ्यावे. शक्य असेल तर डोळ्यावर सन ग्लासेस लावावेत. उष्माघातापासून बचाव होण्यासाठी शरीरातल्या पाण्याची पातळी कायम ठेवणे गरजेचे आहे. ते कमी होऊ नये यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. बरेचदा तहान लागते तेव्हाच लोक पाणी पितात. लिंबाचा रस किंवा लिंबू पाणी शरीरातील उष्णता बाहेर टाकते आणि शरीराला गारवा देते. ताक किंवा मठ्ठा उष्माघातात खूप प्रभावी ठरतो. ताक बनवून त्यात थोडेसं मीठ घालून रुग्णाला पाजत रहावे. त्यामुळे खूपच लाभ मिळतो आणि रुग्णाला ताकदही मिळते. उष्माघाताच्या इलाजामध्ये ताक घेणे हा सर्वांत यशस्वी नैसर्गिक घरगुती उपचारांपैकी एक आहे.
उन्हाचा त्रास होऊ लागल्यास घरगुती उपचाराबरोबरच नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जावे. अनेक ठिकाणी उष्माघात वार्ड तयार ठेवले जातात. तेथे उपचार घेणे अधिक संयुक्तिक ठरेल.
जयंत कर्पे,
माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय, पुणे