मुंबईत आज काँग्रेसचे प्रविण छेडा आणि राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी खासदार संजय काकडे यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती . या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी काकडे भाजपासोबत राहणार असल्याची घोषणा केली. ते स्थानिक राजकारणाने रागवले होते ,रागारागात दिल्लीपर्यंत गेलेही होते पण आता ते आपल्या सोबतच राहतील तसेच त्यांच्यावर लोकसभेसाठी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.काकडे यांचे काम चांगले आहे..त्यांना कॉंग्रेसने तिकीट हि देवू केले होते. पण आता नानांनी निर्णय घेतला कि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम करायचे , स्थानिक पातळीवरील त्यांच्या बाबतचे राजकारण आपण याच पातळीवर संपुष्टात आणू ,नाना आता कुठे अशी शंका नको नाना आता इथेच ..त्यांच्या स्थानिक अडचणी आपण दूर करू असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे .
गेल्या अनेक महिन्यांपासून संजय काकडे हे पुण्यातील भाजपाच्या नेत्यांवर नाराज होते. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठीही ते आग्रही होते. तसेच भाजपाकडून काकडेंना डावलले जात असल्याची चर्चा वारंवार सुरु होती, त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर होते. तशी त्यांनी घोषणाही केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे आपल्या भावासारखे असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले होते. त्यामुळे काकडेंची मनधरणी करण्यात त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध कामाला आल्याचे बोलले जात आहे.