बीड- ‘आमच्या बहीणाबाईच्या घरात सर्व सत्ता आहेत. खासदारकी त्यांच्या घरात, आमदारकी त्यांच्या घरात, राज्याचे मंत्रीपद त्यांच्याच घरात, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, वैद्यनाथ बँक आणि सहकारी साखर कारखाना त्यांच्यात घरात, दारूची फॅक्टरी त्यांच्याच घरात’ असा गंभीर आरोप पंकजा मुंडेंवर केलाय. माजलगावमध्ये कार्यकर्ता मेळावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे यांची उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यातील जनतेने एकाच घरात सगळ्या सत्ता दिल्या. पण ही सत्ता उपभोगणाऱ्यांनी जनतेला काय दिलं असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थिती केला. ‘साधा ऊसतोड मजुरांचा प्रश्नच सोडवू शकले नाहीत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच्या नावाने गोपीनाथ गडावरून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ऊसतोड मजूर महामंडळाचं काय झालं ?’ असे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले.
‘पंकजा मुंडे मंत्री मंडळात आहेत. एखादं महामंडळ जर रद्द करायचं तर मंत्री मंडळाची बैठक घेवून तो विषय रद्द करायचा असतो. महामंडळ रद्द करायच्या बैठकीत स्वत:च्या वडिलांच्या नावाने काढलेलं ऊसतोड मजूर महामंडळ रद्द करताना मंत्री म्हणून मुंडे साहेबांच्या वारसाची सही असेल तर कीती दुर्दैव आहे.’ असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना केला.