पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वरने चिमुकल्यांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रोगाने शुक्रवारी आणखी 9 मुले दगावली. त्यामुळे, एकूणच मृतांची संख्या 67 झाली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांच्या मृत्यूचे कारण हायपोग्लीसेमिया (मेंदूतील ताप) आहे. या परिस्थितीत मुलांच्या शरीरातील ब्लड शुगर अचानक ढासळतो. इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते. हा रोग प्रामुख्याने बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये पसरला आहे. याच ठिकाणी दोन सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व 67 मुलांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय यांनी यासाठी नशीबाला जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते, यासाठी सरकार किंवा प्रशासन जबाबदार नाही. त्या मुलांचे नशीब तसे होते. सोबतच, हवामानाला देखील त्यांनी दोष दिला.
या व्यतिरिक्त मुझफ्फरपूरच्या खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपचार सुरू आहेत. त्यापैकी 9 मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील आरोग्य मंत्र्यांनी शुक्रवारी डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. त्यामध्ये पीडित रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आणि रुग्णालयांत अतिरिक्त बेडसह विशेष विभाग स्थापित करण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये या रोगाने डोके वर काढले आहे. त्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. सोबतच, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संसर्ग पसरलेल्या जिल्ह्यांमध्ये दौरे करण्याचे निर्देश दिले आहेत.