पुणे :- समाजातील वंचित घटकांपर्यंत पोचून त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी बऱ्याच संस्था प्रयत्न करत असतात. मुलांच्या मूलभूत गरजांपासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंतची अनेक जबाबदाऱ्या अगदी नि:स्वार्थ त्या पार पाडत असतात. त्यांचा अशा कामांना प्रोत्साहन मिळावे त्यासाठी गोयल गंगा फौंडेशन सारख्या जास्तीत जास्त संस्थांनी मदतीचा हात पुढे करावा अशी प्रामाणिक अपेक्षा समाजसेविका भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.
नगर रोड येथील चोखी दाणी आणि गोयल गंगा फौंडेशनच्या सहकार्याने अनाथ मुलांसाठी‘आंबा फेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सार्थी विद्यालय , बचपन वल्ड फोरम, ज्ञानेश बाल सदन, संमती बाल निकेतन (बालकाश्रम) , एकलव्य न्यासा, सेवाश्रम सेवा संघ,माहेर, सरस्वती आश्रम, नीती फौंडेशन अशा अनेक संस्थांमधील ५०० पेक्षा जास्त चिमुरडयांनी यावेळी ‘आंबा फेस्ट’चा आनंद लुटला. यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, गीता गोयल,दीपा अमित कुमार, चोखी दाणीचे अध्यक्ष अमित कुमार याप्रसंगी उपस्थित होते.
गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांच्या हस्ते सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला १ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
चोखी दाणी मधील रुचकर जेवणाबरोबरच मॅजिक शो ,पपेट शो, चित्रकला स्पर्धा, राजस्थानी गाणी-नृत्य आणि एकूणच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा बच्चेकंपनीने मनमुराद आस्वाद घेतला.
यावेळी सिंधुताई म्हणाल्या कि, येणाऱ्या पिढीने शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाच्या शक्तीचा, स्वातंत्र्याचा उपयोग समाजहितासाठी केला पाहिजे. ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधता येईल. यातूनच समाजातील वंचित घटकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र येऊन देशाच्या उभारनीस मदत होईल.
जयप्रकाश गोयल आभार व्यक्त करताना म्हणाले कि, आपल्या प्रत्येकाचे समाजासाठी काहीतरी देणे लागते त्यामुळेच प्रत्येकाची ही नैतिक जबाबदारी बनते कि त्यांनी कमावलेल्या पैशातील काही भाग समाज उपयोगी गोष्टींसाठी दिलाच पाहिजे.