पुणे : “आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याची वेगळी ओळख निर्माण होत असून पुणे विमानतळाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्या पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडणारी सध्याची पुणे विमानतळाची जागा यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेक समस्या निर्माण होत आहे. याची गांभीर्याने दखल घेत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संरक्षक मंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी” अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी संसदेत केली.
लोकसभेच्या शून्य प्रहरामध्ये बोलताना ते म्हणाले, पुण्याची लोकसंख्या पाच लाख असताना उपलब्ध असणारी विमानतळाची जागा लोकसंख्या ५० लाखावर पोहचली तरी अजून तेवढीच आहे. त्यामुळे विमान वाहतुकीवर ताण येत आहे. पुण्याचे सध्याचे विमानतळ हवाई दलाच्या तळावर आहे त्यामुळे त्याचा पूर्ण क्षमतेने वापर आणि विस्तार करण्यावर मर्यादा येत आहेत. दुसरीकडे, नागरी सेवेसाठी एकाच उपलब्ध असलेल्या धावपट्टीचा वापर होत असल्याने विमानतळावर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे हवाईदल, विमानतळ प्राधिकरण, लोकप्रतिनिधी यांची संरक्षक मंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवावी अशी विनंती या खात्याच्या मंत्र्यांना मी करतो.
ते पुढे म्हणाले की, राज्यात मंत्री असताना लोहगाव विमानतळाच्या विस्तारासाठी संरक्षण खात्याची अतिरिक्त जमीन देण्यासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीस तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. या बैठकीत विमानतळ विस्तारासाठी लष्कराकडील जमीन द्यावी त्याबदल्यात राज्य सरकारने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी चर्चा झाली होती. पुण्याचे वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरण लक्षात घेऊन हा प्रश्नी मार्गी लावणे गरजेचे असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.