नवी दिल्ली -ओबीसींना कॉंग्रेस न्याय मिळवून देईल .आपल्याच पक्षातील ओबीसी लोकप्रतिनिधींची देखील भाजप मध्ये अवहेलना होते आहे असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वाधिक गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांना वर्षाला प्रत्येकी ७२ हजार रुपये देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करतानाच भाजपाने गरिबांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने गरिबीविरोधात सर्जिकल स्ट्राइक करेल , असे आश्वासन दिले आहे. .
राजस्थानमधील गंगानगर येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसच्या गरिबी हटाव योजनेची माहिती दिली. किमान वेतनाची हमी आम्ही दिली असून या योजनांमुळे २०१९ नंतर देशातील गरिबी नष्ट होईल, असा दावा त्यांनी केला. भाजपाने गरिबांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने थेट गरिबीविरोधातच सर्जिकल स्ट्राईक केले, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा ‘गरिबी हटाव’चा नारा दिला असून देशातील सर्वाधिक गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांना वर्षाला प्रत्येकी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे विधान केले आहे.
मंगळवारी सभेत राहुल गांधी पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये दोन भारत तयार झाले. एक भारत जो फक्त श्रीमंतांचा आहे आणि दुसरा भारत जो शेतकरी, छोटे दुकानदार आणि व्यापारी, नोकरदार, कामगार वर्गांचा आहे. मात्र, आपल्या देशाचा झेंडा एक आहे, तर देशात असे विभाजन नको. मोदीजींच्या भारतात फक्त श्रीमंत स्वप्न पाहू शकतात. तर शेतकरी, गरीब, लहान मुले स्वप्न पाहू शकत नाही. प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये, दोन कोटी तरुणांना रोजगार, शेतकरी कर्जमाफी अशी विविध आश्वासनं मोदींनी दिली. पण यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. नोटाबंदीद्वारे मोदींनी गरिबांकडील पैसे हिसकावून घेतले, गब्बर सिंह टॅक्स (जीएसटी) आकारला, मोदी हे स्वत:ला चौकीदार म्हणतात, पण ते देशातील जनतेचे नव्हे तर अंबानींचे चौकीदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारच्या काळात बँकांची चावी नीरव मोदी सारख्यांच्या हाती आहे, पण काँग्रेसची सत्ता आल्यास तर बँकांची चावी गरिबांच्या हाती असतील, असे त्यांनी सांगितले.