पुणे-
‘पुण्याचा लौकिक लक्षात घेऊनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याचा नियोजनबद्ध
विकास केला मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात भाजपच्या नियोजनशून्य आणि भोंगळ
कारभारामुळे पुणे शहराची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, ‘सोन्याच्या कोंबडी’ वर नक्की
कोणाचा डोळा आहे हे सहज लक्षात येईल अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आ.
अनंतराव गाडगीळ यांनी बुधवारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत केली.
‘पुण्याचा आजवरचा विकास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सोन्याची अंडी
देणारी कोंबडी’ या हेतूने केला असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच पुण्यात केला
त्याला प्रत्युत्तर देताना अनंतराव गाडगीळ म्हणाले, गेल्या चाळीस-पन्नास वर्षाचा इतिहास पाहता
पुण्याचा विकासाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे हे कोणीही सांगू शकेल. सांस्कृतिक
नगरीपासून औदयोगिक नगरी, आयटी हब नगरी पर्यंत पुण्याच्या विकासाचा प्रवास काँग्रेस
राजवटीतच झाला. एकेकाळी ज्या हिंजेवाडी आयटी नगरीमुळे वर्षाला तीन हजार कोटींचा महसूल
मिळत होता तो भाजपच्या राजवटीत दीड हजार कोटींपर्यंत खाली आला. त्यामुळे विकासाला
उतरती कळा कोणामुळे लागली हे सहज कळून येईल असे सांगून गाडगीळ यांनी पुण्यात
एक खासदार, एक मंत्री, आठ आमदार आणि शंभर नगरसेवक असलेल्या भाजपच्या राजवटीत
पुण्याच्या विकासाची कशी अधोगती झाली त्याची अनेक उदाहरणे दिली.
‘स्मार्ट सिटी’ म्हणून पुण्यात सुरु करण्यात आलेल्या एकूण ५६ प्रकल्पांपैकी फक्त १०
प्रकल्प कसेबसे पूर्ण करण्यात आले अशी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात कबुली दिली होती
त्याची आठवण करून देऊन गाडगीळ म्हणाले, पुण्याचा पाणी प्रश्न तसेच वाहतुकीची समस्या
यावर कोणताही तोडगा न काढल्यामुळे हे प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत कारण विकाच्या
प्रश्नाकसे कोणत्याही प्रश्नांकडे भाजपने गांभीर्याने पाहिलेले नाही असाही आरोप त्यांनी यावेळी
केला.
पुण्यातील लोकसभा निवडणुकीतील गिरीश बापट-मोहन जोशी यांच्या लढतीबाबत
विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला मिश्कीलपणे उत्तर देतांना गाडगीळ म्हणाले, आमचा काँग्रेसचा
पैलवान हा शुक्रवार पेठेतील चिंचेच्या तालमीत तयार झाला आहे त्यामुळे तो या निवडणुकीत
नक्कीच बापट यांना धोबीपछाड करेल असा आमचा विश्वास आहे.