पुणे- मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही.
उलट जे काही निर्णय घेतले त्यामुळे समाजातील सर्व वर्गातील घटक हैराण झाले. पंतप्रधान मोदी यांना
निवडणूक प्रचार सभेत सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही त्यामुळेच मोदी वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना
आपला पराभव दिसत असल्याने ते शहिद जवानांच्या नावावर तसेच जातीचे अकारण भावनिक भांडवल
करून जनतेकडे मते मागत आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय
मंत्री आनंद शर्मा यांनी गुरुवारी येथे केली. पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व
मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या
पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी, आमदार शरद रणपिसे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, आमदार अनंतराव गाडगीळ, माजी आमदार दीप्ती चवधरी, संजय
बालगुडे, गोपाळ तिवारी, राष्ट्रवादी काँगेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, आदी उपस्थित होते.
मोदी सरकार सर्व आघाड्यांवर कसे अयशस्वी झाले त्याचा आढावा घेताना आनंद शर्मा यांनी मोदी
यांनी सत्तेचा कसा दुरुपयोग केला याची तपशीलवार उदाहरणे दिली. मोदींच्या राजवटीत देशातील जनता
अतिशय त्रस्त झाली त्यामुळे या सरकारपासून मुक्ती मिळावी अशीच जनतेची भावना आहे आणि
देशातील सध्याचे वातावरण पाहता या निवडणुकीत मोदी आणि भाजपचा पराभव अटळ आहे असे त्यांनी
सांगितले.
मोदी सरकारने गरीब शेतकरी यांची कर्जमाफी केली तर नाहीच उलट उद्योगपतींची साडेतीन लाख
कोटींची कर्जे माफ केली असे सांगून शर्मा म्हणाले, काँग्रेसच्या राजवटी वाढत गेलेला देशाचा
विकासदर, मोदी सरकारच्या राजवटीत घसरतच गेला. मोदी सरकारने घाईघाईने घेतलेल्या नोटाबंदी,
जीएसटी सारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले, नवीन रोजगार मिळण्याऐवजी तरुणांचे आहे ते
रोजगार गेले. त्यामुळे बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढली, पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज दरवाढीमुळे सामान्य जनता
आणखी हवालदिल झाली मात्र दुसरीकडे निधी म्हणून निवडणूक रोखे द्वारे मिळालेल्या प्रचंड पैशामुळे
भाजप हा पक्ष वरचेवर श्रीमंत होत गेला. या पैशामुळे भाजपला कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करणे
सहज सोपे झाले. हा पैसे कोणी दिला आणि त्यांच्या फायद्यासाठी भाजपने काय केले याची चौकशी
होण्याची गरज आहे अशी त्यांनी यावेळी मागणी केली. निवडणुकीनिधी प्रकरणी पारदर्शकता येण्यासाठी
निवडणूक नियमांमध्ये योग्य ते बदल करण्याची मागणीही शर्मा यांनी यावेळी केली.
नरेंद्र मोदी यांच्या ‘कथनी आणि करनी”मध्ये फार मोठा फरक आहे असे सांगून शर्मा म्हणाले, ‘ वह
बोलते है मगर करते कुछ नही याउलट ‘हम’ (काँग्रेस) करते है मगर बोलते नही’हा भाजप आणि काँग्रेस
यांच्यातील फरक आहे असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी २०१४ साली जनतेला दिलेले एकही आश्वासन
पूर्ण केले नाही त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या जाहीरनाम्यात २०१४ सालचीच
आश्वासने देण्यात आली आहेत ते त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार गोरगरिबांच्या खात्यात वार्षिक ७२ हजार रुपये
(न्याय) आणि रोजगाराला प्रोत्साहन या प्रमुख बाबींना काँग्रेस प्राधान्य देणार असून जनताही आमच्या या
वचननाम्याकडे गांभीर्याने पाहत आहे असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचे नव्हे तर त्या कायद्याचा आढावा
घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे असे स्पष्ट करून शर्मा म्हणाले, जनतेचे लक्ष मूळ समस्यांवरून
हटविण्यासाठी भाजपकडून हा कांगावा करण्यात येत आहे. राष्ट्रभक्ती ही काही एकट्या भाजपची
मक्तेदारी नाही. जी व्यक्ती मोदी किंवा भाजपविरोधी बोलेल ती देशद्रोही असे आता नवे समीकरण झाले
आहे. काँग्रेसचे दोन पंतप्रधान (इंदिरा गांधी आणि राजीव गांधी) देशाच्या रक्षणासाठी बळी गेले हा इतिहास
माहित असताना काँग्रेस पाकिस्तानला मदत करीत आहे असा आरोप करायला पंतप्रधान मोदी यांना थोडी
तरी लाज वाटायला पाहिजे होती असेही ते म्हणाले.