पुणे – पुणे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे गिरीष बापट यांनी माझा उल्लेख रेवड्यावरचापहिलवान असा केला. पण
त्यांना सतपाल आणि हरिश्चंद्र बिराजदार यांच्या कुस्तीचा इतिहास महिती नसावा. सतपालांना पुण्यात चारीमुंड्या चीत
करणा-या हरिश्चंद्र बिराजदार हे माझे आदर्श आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सत्तेत राहून मस्तवाल झालेल्या गिरीश
बापटांना आम्ही बिराजदारांचा हिसका दाखवून चारीमुंड्या चीत करू असे खुले आव्हान, पुणे शहर लोकसभा
मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – पिपल्स रिपब्लीकन आघाडी, शेकाप आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीचे
उमेदवार मोहन जोशी यांनी आज संवाद यात्रेच्या सांगता सभेत दिले.
मोहन जोशी पुढे म्हणाले, माझा जन्म खडकमाळा आळीचा, तर माझी जडणघडण चिंचेच्या तालमीत आणि पुणेकरांचा
तालमीत झालेली आहे. या निडणुकीत गिरीष बापट यांना चारीमुंड्या चीत केले नाही तर पुन्हा पुणेकरांसमोर मतं
मागायला येणार नाही. या सभेत बोलताना आमदार अनंतराव गाडगीळ यांनी मोदींच्या स्टाइलने कार्यकर्ते व
नागरीकांना प्रश्न विचारले…….खात्यात 15 लाख जमा झाले का ? रोजगार मिळाला का ? मेट्रो पुण्यातून धावली का ?
वगैरे सर्वच प्रश्नांची उत्तरे “नाही” अशी येत असतानाच मग काहीही न करणा-यांना मतदान करणार का ? असे
विचारताच सर्वांना एक सूरात “नाही” असे सांगितले. राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष नितीन कदम यांनी गेल्या वर्षी
पावसाळ्यात धरणे पूर्ण भरलेली असतानाही आपल्याला पुरेसे पाणी केवळ पालकमंत्र्यांमुळे मिळू शकत नसल्याने त्यांना
या निवडणुकीत पराभूत केलेच पाहिजे असे आव्हान केले. शिवाजी गदादे पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या
नगरसेवकांनी केलेल्या कामाच्या जोरावर पुण्यातून सर्वाधिक मताधिक्य मोहन जोशी यांना निवडणुकीत देऊ अशी ग्वाही
दिली. या निवडणुकीत उरलेल्या दिवसात कार्यकर्त्यांनी आता घरोघर जाऊन आपणच उमेदवार मोहन जोशी आहोत य़ा
भावनतून मतदारांशी संवाद साधावा असे आवाहन नगरसेवक आबा बागूल यांनी केले.
या संवादयात्रेत काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे, आमदार अनंतराव गाडगीळ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, नगरसेविका प्रिया गदादे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गदादे पाटील, संजय बालगुडे, बाळासाहेब दाभेकर, शिरीष मावळे, काँग्रेसचे पर्वती
ब्लॉकचे अध्यक्ष सतीश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती ब्लॉक अध्यक्ष नितीन कदम, राष्ट्रवादी कसबा ब्लॉकचे अध्यक्ष
विनायक हणमगर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अर्चना विठ्ठल हणमगर, शशिकला कुंभार, अमीत बागूल, सतीश कांबळे,
अभिजीत गायकवाड, राजेंद्र पेशने, आनंद बाफना, विकास लांडगे, जयकुमार ठोंबरे, शशिकांत तापकीर, मदन वाणी,
यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पक्षांचे पदाधिकारी या संवाद यात्रेत सहभागी झाले होते.
सहकारनगर मधील संत गजानन महाराज मठात दर्शन घेऊन मोहन जोशी यांनी संवाद यात्रेला प्रारंभ केले.
देवदर्शनानंतर जवळच्या डॉ. आंबेडकर वसाहतीत कार्यकर्ते त्यांना घेऊन गेले. तेथे सर्वांशी संवाद साधल्यावर, मठाच्या
समोरच्या बाजूल असलेल्या वसाहतीत जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर दत्तवाडी पोलिस स्टेशन,
लक्ष्मीनगर, पर्वतीगावातून संवाद यात्रा जनता वसाहतीत गेली. आजच्या संवाद यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक वेळ
सुमारे तीन तास मोहन जोशी हे जनता वसाहतीत मतदारांशी संवाद साधत होते. रस्त्यावर जीपमधून तर कुठे
कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला. आजच्या संवाद यात्रेत वाद्यांचा दणदणाट सुरूवातीपासून
होता. जनता वसाहतीच्या प्रवेश व्दाराशी उमेदवार येताच शिवाजीराव गदादेपाटील यांनी “ए बजाओ” असे सांगतात
वाद्यांचा आवाज दुपटीने वाढला कारण त्यात आणखी एक वाद्यवृंद सहभागी झाला होता. जनता वसाहतीच्या प्रवेश
व्दारावर संवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. महिलांनी त्यांना ओवाळले.
जनता वसाहत आणि लक्ष्मीनगर परिसरात काही ठिकाणी येत्या रविवारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
जयंतीच्या कार्यक्रमाची तयारी कार्यकर्ते करत होते. त्यांना जय भीम म्हणत मोहन जोशी यांनी प्रतिसाद देत होते. जनता
वसाहतीत कुठे शिवगर्जना कुठे महाराष्ट्र गर्जना तर कुठे भीम गर्जना करत संवाद यात्रा चालली होती. अनेक ठिकाणी
कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या माळा लावून अन घोषणा देत स्वागत केले. संवाद यात्रेच्या मार्गावर दुतर्फा काँगेस, राष्ट्रवादी
काँग्रेस व महाआघाडीतील मित्र पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी मतदार, व्यापारी यांनी लिंबूपाणी,
थंडगार पाणी देत होते. जनतावसाहतीतून सिंहगड रोडवर संवाद यात्रेची सांगता छोट्या जाहीर सभेने झाली.