पुणे- नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपला मतदार संघ सोडून जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तिथे वेगळा निकाल लागला तर आश्चर्य वाटू देऊ नका. तसेच वातावरण पुणे मतदार संघात आहे. गेल्या चार दिवसात या मतदार संघातील मतदारांचा प्रतिसाद बघता पुणे लोकसभा मतदार संघातही आश्चर्यकारक निकाल लागल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीच्या उमेदवारा मोहन जोशींच्या प्रचारार्थ कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा कॅम्प एज्युकेशन सोसायटी येथे पार पडला त्यावेळी चव्हाण बोलत होते. पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, कमल ढोले पाटील, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, भीम आर्मीचे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ, लताताई राजगुरू, रफिक शेख, , अविनाश बागवे, विठ्ठल थोरात, , भोलासिंगअरोरा, सईम शेख, भारत कांबळे, प्रदीप गायकवाड, अशोक कांबळे, रशीद शेख माजी महापौर प्रशांत जगताप, वालचंद संचेती ,कासमभाई शेख, प्रकाश साळवे, आदी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, मोदी विकास करण्यात अपयशी ठरले असून त्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यांनी पायाभूत सुविधांची कामे केली मात्र शिक्षण आरोग्य याबाबत काहीच काम केले नाही. शेतकऱ्यांच्या मालाला किमती न देता ग्राहकांना कमी दरात शेतीमाल मिळण्यासाठी चुकीचे आयात निर्यात धोरण त्यांनी राबवले. नोटबंदी , जीएसटी सारखे अविचारी निर्णय घेतले. मोदींना सत्ता मिळाली परंतु त्यांची हुकुमशाही प्रवृत्ती आहे. ते लोकशाही मान्य असल्याचा ते केवळ देखावा करतात. परत त्यांच्या हातात आत्ता गेली तर पुन्हा निवडणुका न होण्याची शक्यता आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
मोदींना प्रश्न विचारले की प्रश्न विचारणारा लगेच देशद्रोही ठरतो. त्यामुळे मोदी प्रत्येक बाबतीत या देशाच्या भवितव्यासाठी घातक आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली. प्रकाश आंबेडकरांनी काय गणित मांडले माहिती नाही. मात्र, त्यांच्या उमेदवारांमुळे मते विभागली जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल. आंतरराष्ट्रीय बातम्यांना मोदी उत्तर देत नाही. निवडणुका जवळआल्या की राष्ट्रीय सुरेक्षचा प्रश्न चर्चेत आणायचा असे हे मोदी ही निवडणूक व्यक्ती केंद्रित करू करू पाहत आहे, परंतु तुंम्ही त्यांना उत्तरे देत बसू नका, तर त्यांना प्रश्न विचारा असे आवाहन त्यांनी केले.
अरविंद शिंदे म्हणाले,लोकसभेची ही एकमेव निवडणूक आहे. जिथं जिथं जातो तिथं भाईचारा, दलित आणि
अत्याचाराचा विषय, बरोजगरीची भाषा संविधान धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पामनामध्ये
कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात नेहेमी विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली गेली आहे. 11 दिवस जलपर्णीचा विषय
सभागृहात मांडला तर ६० ते ७० पोलिसानी घराला वेढा घातला आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला . बापटांनी
पोलिसांना सांगून एक दिवस तरी आत टाका, असे सांगितले. जलपर्णीच्या २३ कोटींच्या निविदेबाबत आपण काही
बोलायला गेलो की हे दुसरेच काहीतरी बोलणार. असे ते म्हणाले.
रमेश बागवे म्हणाले, या देशात लोकशाही आणायची की हुकुमशाही आणायची हे ठरवण्याची ही निवडणूक आहे.
मोदी सरकारने एकही विकासकामे केले नाही. शेतकरी, गरिबांची चेष्टा करून त्यांनी लोकांना फसवले. प्रत्येकाला
आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार घटनेने सर्वांना दिला आहे. मात्र, भाजप सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच
गदा आणली आहे. मोदी महात्मा गांधींचा उदोउदो करतात परंतु गांधीजींची हत्या केली त्या नथुराम गोडसेचे मंदिर
बांधण्याची भाषा भाजपचे खासदार करतात त्यांच्याबाबत मोदी काही बोलत नाही आणि कारवाईही करत नाही. देशात
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. दलितांची, बेरोजगारांची
फसवणूक केली कॉंग्रेसने केलेला अन्न सुरक्षेचा कायदा भाजपने रद्द केला अशी टीका त्यांनी केली.
प्रशांत जगताप म्हणाले, एक खासदार, पालकमंत्री, आठ आमदार, ९७ नगरसेवक एवढे असूनही भाजपकडून पुणे
शहराला काय मिळाले याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. केंद्रामध्ये डॉ. मनमोहनसिंगांचे सरकार असताना
विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुणे शहरासाठी केंद्राकडून २८०० कोटी रुपये
पुणे शहरासाठी मिळाले. त्यातून बीआरटी, जॅकवेल अशी अनेक कामे मार्गी लागली. गिरीश बापट यांना पालकमंत्री
असूनही २८० रुपये सुद्धा केंद्रसरकारकडून आणता आले तर नाहीच त्याउलट त्यांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळवले,
अशी टीका त्यांनी केली.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, कॅन्टोन्मेंटचा अध्यक्ष हा लोकांमधून निवडून गेलेला असावा यासाठी सरकार
बदलण्याची आवश्यकता आहे. या देशाचे संरक्षण खर्या अर्थाने महात्मा गांधीं, ६४ गोळ्या अंगावर झेलून इंदिरा गांधी
आणि आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या राजीव गांधींनी केले आहे. असे असताना पंतप्रधान मोदी आपण चौकीदार
असल्याचे सांगतात परंतु हे सरकार निकामी आहे. मोदींना कुटुंब नाही, मुले नाही ते देशाला काय सांभाळणार असा
सवाल त्यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यात, विकासात, विविध संस्थांच्या निर्मितीत आणि विज्ञान व तंत्रज्ञानात जी
प्रगती झाली ते कॉंग्रेसच्याच काळात झाली आहे. म्हणून देशात पुन्हा आघाडीचे सरकार आणण्याची आवश्यकता
आहे, त्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करा असे आवाहन त्यांनी केले.
मोहन जोशी म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली. लोकांना परिवर्तन
हवे आहे, हे लोकांना भेटल्यानंतर लोकच सांगतात. आता उरलेल्या दिवसांमध्ये राहुल गांधींचा संदेश, त्यांनी
जाहीरनाम्यात दिलेली न्याय योजना या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी केले.
कमल ढोले पाटील, सुजाता शेट्टी, भीम आर्मीचे दत्ता पोळ, राष्ट्रवादीचे कासमभाई शेख, दलित पंथरचे प्रकाश
साळवे यांचीही यावेळी भाषणे झाली. अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रदीप परदेशी यांनी आभार मानले.