पुणे- नवीन सर्वेक्षणानुसार भाजपला २०० पेक्षा कमी जागा मिळतील. त्यामुळे देशातील वातावरण बघता भाजपच्या
पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैनिकांच्या नावावर आणि स्वत:ची जात
सांगत मते मागायला लागले आहेत. साध्वी प्रज्ञासिंहला उमेदवारी देऊन भाजपने त्यांचा उद्देश स्पष्ट केला आहे. साध्वीची
उमेदवारी लक्षात घेता भाजपने पुण्यातून मिलिंद एकबोटे आणि सांगलीतून मनोहर भिडे यांना उमेदवारी दिली असती
तरी आश्चर्य वाटले नसते अशी टीका मराठासेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रांताध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केली.
कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ
कॉंग्रेस भवन येथे आयोजित बहुजन जागृती मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी शांताराम कुंजीर, बाळासाहेब अमराळे,
माजी महापौर मोहनसिंग राजपाल, नगरसेवक दत्ता बहिरट, संगीता तिवारी, सचिन तावरे, अजय दरेकर,भीम आर्मीचे
दत्ता पोळ, प्रकाश भालेराव, सागर आल्हाट, सोनाली मारणे, डॉ. सुनीता मोरे, प्रभाकर दुर्गे, सचिन आडेकर, भोला
वांजळे, रमेश हांडे, विशाल तुळवे, अजयसिंह सावंत, हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, प्राची दुधाने, श्री वाघमारे आदी
यावेळी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, मेक इन इंडियाचा खरा प्रयोग स्व. पं. जवाहरलाल नेहरूंनी केला. मोदी, कॉंग्रेसने ७० वर्षात काय
केलं विचारतात. परंतु कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. एक राज्यघटना आणि लोकशाही दिली. म्हणूनच एक
चहा विकणारा पंतप्रधान झाला. मोदी काँग्रेसमुळे पंतप्रधान झाले त्यामुळे मोदींनी कॉंग्रेसचे उपकार विसरू नये असा
उपरोधिक टोला त्यांनी लगावला. देशात ५२५ संस्थानिक होते. त्यांना एकत्र करून कॉंग्रेसने भारत देश बनवला. राजीव
गांधींमुळे टेलिकॉम क्रांती झाली. त्याच्यानंतर मोबाईल क्रांती झाली. धर्मनिरपेक्ष राज्य कॉंग्रेसने दिले. तुम्ही काय दिले?
असा सवाल त्यांनी मोदींना केला.
१९९१ साली पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि
जागतिकीकरण यावर सह्या केल्या. त्यावेळी बरोबर ६ डिसेंबरला बाबरी मस्जीद पाडली गेली. या देशात विकासाची
गंगा वाहणार होती त्याचवेळी बरोबर १९९३ ला मुंबईत दंगली घडवल्या गेल्या. त्यामुळे १९९२-९३ च्या काळात
भारताची जगात प्रतिमा जातीयवादी, दंगली करणारा देश अशी झाली असे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीतल्या दिग्गज नेत्यांची मुले भाजपमध्ये गेले आहेत. भाजप हा पक्ष नाही तर तो आरएसएसचा चेहरा
आहे. आरएसएस या भाजपच्या मातृ संघटनेला तिरंगा, देशाची घटना व लोकशाही मान्य नाही. हे त्या पक्षात
जाणाऱ्यांना मान्य आहे का असा सवाल त्यांनी केला. मोदींना पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी जनतेच्या मनात
उत्सुकता निर्माण केली गेली. मात्र, त्यावेळी राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० वे कलम याबाबत जी
आश्वासने दिली होती ती कुठे गेली? छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक होणार होते त्याचे
काय झाले?, धनगर, मुस्लीम आरक्षण, मराठा समाजाच्या आरक्षणाचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.
राफेल विमानाच्या खरेदीमध्ये ३० हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा
झाला आहे. कॉंग्रेसच्या काळात घोटाळ्यांचे आरोप झाल्यानंतर कॉंग्रेसनेच चौकशीसाठी कारवाई केली. परंतु
सर्व निर्दोष सुटले. त्यामुळे मोदी यांची ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ ही घोषणा केवळ खोटी ठरली आहे अशी
टीकाही त्यांनी केली.
शांताराम कुंजीर म्हणाले, मराठा समाजाचे राज्यात शांततेत ५८ मोर्चे निघाले. या सरकारने मागण्यांबाबत
केवळ आश्वासने दिली. आता आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात नेवून ठेवला आहे. सारथी योजना जाहीर
केली त्याबाबत कुठलीही अंमलबजावणी केली नाही, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज
प्रकरणे होत नाहीत, प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात जी चार
अगोदरचीच वसतिगृह होती त्याला फक्त रंगरंगोटी करून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली.
समाजात तेढ निर्माण करायची असे करून लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे या
नाकर्त्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व
मित्रपक्षांच्या उमेदवारांमागे उभे राहणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.
संगीता तिवारी म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
लहान मुलींवर होणाऱ्या बलात्कार वाढले आहेत. त्याबाबत काहीही न करता मोदी सरकार केवळ ‘बेटी
बचाव बेटी पढाव’ची घोषणा करते. भाजपच्या मंत्र्यांचे महिलांबाबतचे वक्तव्य आणि कृती पहिली तर ‘
बेटी भगाव’ हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे की काय असे वाटते. मोदी सरकारने गृहिणींनी घरामध्ये बचत करून
साठवलेल्या पैशावर डल्ला मारला. त्यांना बँकेत पैसे भरायला लावले तो पैसा काळा केला असा आरोप
त्यांनी केला.
सचिन तावरे म्हणाले, मी कॉंग्रेस पक्षात काही मिळवायला आलेलो नाही तर इतिहास घडवायला आलो
आहे. ही निवडणूक दोन विचारांची आहे. एका बाजूला असभ्यता, अश्लीलता तर दुसऱ्या बाजूला सभ्यता,
सुसंस्कृत, महिलांचा कायम आदर करणारा माणूस आहे. देठ हिरवा..म्हणणारा, तूरडाळीचा भ्रष्टाचार
करणारा अशा या हिरव्या देठाला जमिनीत गाडावे असे तावरे यांनी आवाहन केले.
यावेळी प्रकाश भालेराव, सागर आल्हाट, डॉ. सुनीता मोरे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन शांताराम
कुंजीर यांनी केले आभार सचिन आडेकर यांनी मानले