पुणे-बँकिंग सेवांचे वाढलेले दर, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दराचा बोजा आणि जीएसटीमुळे सोसावा लागणारा अतिरिक्त करांचा भार अशा सार्या समस्यांमुळे शहरी मध्यमवर्गीय चांगलाच वैतागला असून हा वर्ग यावेळी भाजपला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत आहे असे प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज कोथरूड विधानसभा मतदार संघात आयोजित विशाल रॅली नंतर ते बोलत होते.
ते म्हणाले की, मध्यमवर्गीयांना परवडतील अशा दरात छोटे फ्लॅट निर्माण करण्यासाठी जे धोरणे भाजपने आखली नाहीत. तसेच मध्यमवर्गीय घरातील करती मुले शिक्षण घेऊनही बेकार बसले आहेत. वणवण फिरूनही त्यांना नोकर्या मिळत नाहीत. शिक्षण आणि आरोग्य याचा खर्च हाताबाहेर गेला आहे. मिळणार्या महिन्याच्या पगारात प्रपंच चालवणे मध्यमवर्गीयांच्या हाताबाहेर गेल्याने
हा वर्ग हतबल झाला आहे. आणि भाजपच्या सरकारवर तो कमालीचा वैतागला आहे. हा वर्गच भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मोठी भूमिका बजावेल असे चित्र आहे. पुण्यात हे चित्र सर्वत्र जाणवत आहे असेही जोशी यांनी यावेळी नमूद केले.
पाषाण गावठाण येथील शिवाजी पुतळ्यास हार अर्पण करून व वंदन करून या रॅलीची सकाळी सुरूवात झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे रिक्षातून केली जाणारी अनाउन्समेंट, जोरदार घोषणा आणि फटाक्यांचा कडकडाट अशा जल्लोषात निघालेल्या या रॅलीला मार्गात ठिकठिकाणी नागरिक थंड पाणी, नारळ पाणी देत होते. अनेक ठिकाणी महिलांनी मोहन जोशींना ओवाळून शुभेच्छा दिल्या. मार्गावरील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देखील मोहन जोशींचे स्वागत केले. शिवाजी पुतळ्याहून ही रॅली पाषाण गावठांण – सुस रोड – साई चौक
– (पाषाण बाणेर) लिंक रोड – महाबळेश्वर हॉटेल – सोमश्वर वाडी – बाणेर फाटा – सानेवाडी – डी. पी. रोड – विधाते वस्ती – पल्लोड – ग्रीन पार्क – महाबळेश्वर हॉटेल – बाणेर गावठाण – बालेवाडी फाटा – बालेवाडी गाव – शरद बालवडकर यांच्या निवासस्थान येथे समाप्त झाली.
या रॅलीमध्ये बाबूराव चांदेरे, चंदूशेठ कदम, प्रमोद निम्हण, उमेश कंदारे, विजय खळदकर, रामदास काळे, नितीन कळमकर, दत्ता जाधव, रोहित धिंडे, बालन सुतार, शिवाजी बांगर, सुनिल चांदेरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.