पुणे–राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या (इंटक) रविवारी सायंकाळी काँग्रेस भवनात झालेल्या भव्य मेळाव्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीच्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यास विविध क्षेत्रातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, इंटक पुणे शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष व या मेळाव्याचे संयोजक कैलास कदम, पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी माजी आमदार दीप्ती चवधरी, राष्ट्रवादीचे गोपालकृष्ण गुनाळे, शहर काँग्रेसच्या उपाध्यक्ष शलाका पाटील, इंटकचे कायदेशीर सल्लागार फैयाज शेख व अन्य कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल म्हणाल्या की, ‘जुमले की सरकार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदी सरकारच्या राजवटीत कामगारांचे कोणतेही प्रश्न सोडविण्यात आले नाहीत मात्र काँग्रेसने नेहमीच कामगार हिताचे धोरणे राबविली आहेत त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना विजयी करणे हे प्रत्येक कामगारांचे कर्तव्य आहे.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, मोदी सरकारचे धोरण कामगारविरोधी व उद्योगपतीधार्जिणे होते त्यामुळे कामगारांचे फार नुकसान झाले. नोटबंदीच्या निर्णयामुळे हजारो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेकारी यामुळे कायदा व सुव्यस्थेची स्थिती बिघडली. त्यासाठी आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे. कामगारांनी एकजुटीने काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी म्हणाले, मीही सुरुवातीला एक गिरणी कामगार होतो. कामगारावर अन्याय झाल्यास त्यासाठी आंदोलन करणारा करणारा कार्यकर्ता होतो. त्यामुळे या निवडणुकीत मी निवडून आल्यास कामगारांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे त्यांनी आश्वासन दिले.
इंटक पुणे शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष व या मेळाव्याचे संयोजक कैलास कदम यांनी इंटकचे कामाचा आढावा घेऊन सांगितले की, देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याची कामगार शक्तीची ताकद आहे मात्र गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने कामगारांचे कोणतेच प्रश्न सोडविले नाहीत उलट त्यांचे जिणे हराम केले त्यामुळे हे सरकार आता खाली खेचण्याची गरज निर्माण झाली आहे त्यासाठी सर्व कामगारांनी काँग्रेस आणि आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
याप्रसंगी शहर काँग्रेसच्या उपाध्यक्ष शलाका पाटील, राष्ट्रवादीचे गोपालकृष्ण गुनाळे, नासिरुद्दीन इनामदार, रफिक शेख आदींची भाषणे झाली. श्री मनोहर गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल आवटी यांनी आभार मानले.
काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन जोजही यांच्या प्रचारार्थ रविवारी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दांडेकर पूल -पानमळा -सिंहगड रस्ता -राजाराम पूल- हिंगणे खुर्द – जनता वसाहत -पर्वती गाव – लक्ष्मीनगर -सारंग सोसायटी- सहकारनगर -अरण्येश्वर- दाते स्टॉप -ट्रेझरपार्क सहकारनगर पोलीस स्टेशन या मार्गाने गेलेल्या या रॅलीचा चव्हाण नगर तीन हत्ती चौक इथे समारोप झाला. शंभरहून अधिक मोटारसायकलींसह कार्यकर्ते काँग्रेस व मित्रपक्षांच्या झेंड्यासह या रॅलीत सहभागी झाले होते. उमेदवार मोहन जोशी या रॅलीत सहभागी झाले तेंव्हा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अभय छाजेड यांनी या रॅलीचे आयोजन केले होते.