पुणे- मोदी पुन्हा सत्तेवर आले, तर देशात संविधान आणि लोकशाही टिकणार नाही. या निवडणूकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी अक्षरश: पायघड्या घातल्या होत्या. मात्र त्यांनी अवास्तव मागण्या करुन महाआघाडीत येणे टाळले. राज्यात प्रत्येक मतदार संघात उमेदवार देऊन ते मतांचे विभाजन करुन अप्रत्यक्ष भाजपला मदत करीत आहेत.
असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच लोक हुशार आहेत, सत्याची बाजू त्यांना कळते त्यामुळे ते महाआघाडीच्या उमेदवारालाच मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ गोखले नगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे, आमदार अनंतराव गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, डॉ. नितीन राऊत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,ज्येष्ठ नेते प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, उमेदवार मोहन जोशी, माजी आमदार दिप्ती चवधरी, भटक्या विमुक्ताच्या प्रतिनिधी प्रा. सुषमा अंधारे, गोपाळ तिवारी, सचिन तावरे, माजी नगरसेवक रुपाली ठोंबरे-पाटील,निलेश निकम, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, मोदींनी भरमसाठ आश्वासने दिली. मात्र एकाहीची पुर्तता केली नाही. त्यामुळे पाच वर्षे अत्यंत निराशाजनक गेली. त्यांनी चुकीच्या धोरणामुळे शेतकर्यांना उद्धवस्त केले. एक कोटी लोकांचा रोजगार गेला. जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. देशभरात अन्याय अत्याचार करणार्यांना मोदी पाठिशी घालीत आहेत. मागील निवडणूकीत भाजपला
केवळ 31 टक्के मते मिळाली होती. सुमारे 62 टक्के मतदारांनी त्यांना नाकारले होते. यावेळी महाआघाडीमुळे मतविभाजन टळेल. राफेल विमान खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर मोदींची जागा संसदेत नाही, तर जेलमध्ये असेल. त्यांचे सहकारी अमित शहा जेलमध्ये जावून आले आहेत. ते देशासाठी जेलमध्ये गेले नव्हते, तर
दंगलीत कत्तल केल्यामुळे अटक झाली होती. त्याच वेळी त्यांना अहमदाबाद येथून हद्दपार करण्यात आले होते. असा हल्लाबोल चव्हाणांनी केला. न्यायाधीश लोया यांच्यावर राजकीय दबाव होता. त्यांचा मृत्यूही संशयास्पद आहे. सत्तेवर आलो, तर प्रथम लोया, सोहबराद्दीन खुन प्रकरणाची चौकशी करु. देशात खुनाची मालीका सुरुच आहे. पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे. हवाई हल्ल्यात दहशतवादाचे नेटवर्क नष्ट करणे आवश्यक असते. ते केले गेले का असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, समाज माध्यमावर उथळ भक्त कलम 124 अ वरुन भरभरून चर्चाकरीत आहेत. मात्र काँग्रेसने हे कलम रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो.
डॉ. नितीन राऊत म्हणाले, संविधानाने महिलांचा स्वाभिमान बहाल केला. हा देश संघराज्य आहे. या राष्ट्राला तडा जाता कामा नये. महिलांवरील अत्याचार वाढले, बेरोजगारी वाढली. आवाज दाबून अभिव्यक्तीवर घाला घातला जात आहे. ज्यांनी आजपर्यंत देशासाठी काहीच केले नाही तेच आता देशवाशीयांना देशभक्ती शिकवित आहेत. त्यामुळे या खोट्या सरकारला या निवडणूकीत पराभव
केला पाहिजे. डॉ. नितीन राऊत, प्रा. सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरे, निलेश निकम, दत्ता बहिरट, दिप्ती चवधरी यांची भाषणे झाली.