पुणे-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा भारतीय जनता पक्ष देशात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करीत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाची मोडतोड करण्याचाही त्यांचा विचार आहे. भाजपचा हा विघातक मार्ग रोखण्यासाठी ‘गणराज्य चळवळीतील विविध सामाजिक संघटनांनी महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा आंबेडकरी आणि स्त्री-मुक्ती चळवळीतील ज्येष्ठ नेत्या सुषमा अंधारे यांनी
केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवनात आज झालेल्या पत्रकारपरिषदेत त्या बोलत होत्या.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , आमदार शरद रणपिसे,कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप;गणराज्य चळवळीतीळ कार्यकर्ते रमेश राक्षे, अनिल हातागळे, रावसाहेब खंडांगळे, काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेले सचिन तावरे आदी उपस्थित होते.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, गेल्या ५/६ महिन्यांपासून जनवादी चळवळी अंतर्गत महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संघटनांच्या एकत्रीकरणाचे काम चालू आहे. त्यातूनच एकत्र आलेल्या २२ लोकशाहीवादी सामाजिक संघटनांनी काँग्रेस आघाडीला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील लोकशाही टिकण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रमेश राक्षे म्हणाले, चळवळीत काम करताना अनेक आव्हाने निर्माण झाली. भीमा- कोरेगाव प्रकरणात खरे आरोपी बाहेर होते मात्र आमच्याच कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रवृत्तींविरुद्ध लढा देण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिल हातागळे म्हणाले, भाजपच्या राजवटीने मातंग समाजावर अन्यायच केला. मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी भाजप सरकारने फेटाळली मात्र शरद पवार यांनी त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. या निवडणुकीत भाजप-सेनेविरुद्ध रान उठविण्याचा आम्ही निर्णय घेतला असून काँग्रेस आघाडीला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला
आहे.