पुणे-‘गेल्या पाच वर्षातील मोदी सरकारच्या राजवटीमुळे देशाचे संविधान, तसेच
लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही महत्वाची मूल्ये धोक्यात आली आहेत.
त्यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास ही मूल्ये टिकतील का नाही याबद्दलच शंका आहे
त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपचा निर्णायक पराभव होणे आवश्यक आहे असे आवाहन
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ् आणि काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केले आहे. काँग्रेस-
राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन
येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत मुणगेकर बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे
प्रवक्ते व आमदार शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, प्रदेश काँग्रेसच्या सदस्य शानी नौशाद,
दलित चळवळीतील नेते रतनलाल सोनग्रा आदी उपस्थित होते.
मोदी सरकारच्या राजवटीवर घणाघाती टीका करताना भालचंद्र मुणगेकर पुढे म्हणाले,
मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला जी आश्वासने दिली होती त्यातील एकही पाळले नाही.
लोकसभा निवडणुकीनिमित्त तयार करण्यात आलेला भाजपचा जाहीरनामा देखील पराभूत
मानसिकतेतून तयार करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. या जाहीरनाम्यात २०१४ साली दिलेली
आश्वासनेच देण्यात आली आहेत याचा अर्थ गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने काय केले? हा
प्रश्न निर्माण होतो. मोदी सरकारने दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात चार
कोटी लोकांचे रोजगार गेले आणि पाच कोटी लोक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत असे सांगून
मुणगेकर यांनी, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी लागू करण्यात आलेली नोटाबंदी म्हणजे शुद्ध
भंपकपणा होता असे सांगितले.
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्व आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी
झाल्याचे आकडेवारीनुसार सांगताना मुणगेकर म्हणाले, गेल्या पाच वर्षात आर्थिक तसेच
सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली. शेतकरीवर्ग कमालीचा त्रासून गेला तर मुस्लिम
आणि दलित समाजांवर हेतुतः अत्याचार करण्यात आले. ‘मॉब लिंचिंग’सारखे जगाच्या पाठीवर
कोठेही न घडणारे प्रकार मोदी सरकारच्या राजवटीत घडले. रा. स्व. संघाच्या विचारसरणीच्या
दबावाखाली मोदी सरकार काम करते असा आरोप करून ते म्हणाले, गेल्या साठ वर्षात काँग्रेसने
काहीच केले नाही हे मोदी यांचे सातत्याने केलेले विधान म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस आहे.
आतापर्यंतची देशाची प्रगती काँग्रेसनेच केली हे कोणीही नाकारू शकणार नाही. गेल्या पाच वर्षात
मोदी एकदाही पत्रकारपरिषदेला सामोरे गेले नाहीत. त्यांच्याजवळ तेवढे धैर्य नसल्यामुळेच त्यांनी
आपली 'मनकी की बात' सुरु केली असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याबत बोलताना मुणगेकर म्हणाले, काँग्रेसचा
जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा आहे जास्तीत जास्त राज्यात जाऊन तेथील लोकांशी प्रत्यक्ष
चर्चा करून व त्यांच्या अनेक चांगल्या सूचना विचारात घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात
आला त्यामुळे लोकांच्या अपेक्षांचे त्यामध्ये दर्शन घडले आहे. आणि त्यासाठी काँग्रेस वचनबद्ध
आहे. पाच कोटी गरीब लोकांना न्यूनतम आय योजना अंतर्गत (‘न्याय’) वर्षाला ७२ हजार रुपये
देण्यासंबंधीचा काँग्रेसचा निर्णय क्रांतिकारी आहे. त्यामुळे मोदी सरकार चांगलेच कोंडीत सापडले
आहे असे सांगून ते म्हणाले, या योजनेसाठी कसा निधी उभा करावयाचा तेही काँग्रेसने निश्चित
केले आहे. हा दारिद्र्यावरचा शेवटचा घाला असेल असेही ते म्हणाले. काँग्रेसचा जाहीरनामा हा
राष्ट्रविरोधी आहे या कायदेमंत्री अरुण जेटली यांच्या आरोपाचा समाचार घेताना ते म्हणाले, जेटली
यांनी अर्थमंत्री म्हणून एक तरी चांगला कार्यक्रम पाच वर्षात जाहीर केला आहे काय? नोटाबंदी
सारखा महत्वपूर्ण निर्णय देखील या अर्थमंत्र्याला माहित नव्हता. काँग्रेसचा जाहीरनामा हा मुळीच
राष्ट्रविरोधी नाही असे स्पष्ट सांगून मुणगेकर यांनी राष्ट्रवाद, देशभक्ती ही कोण्या एका पक्षाची,
धर्माची वा जातीची मक्तेदारी नाही. तसेच निवडणुकीच्यानिमित्ताने देशाच्या जवानांच्या शौर्याचे
राजकारण केले जाऊ नये असे त्यांनी शेवटी मोदींना उद्देशून सांगितले.