पुणे-सवंग घोषणा करणारे मात्र प्रत्यक्षात चांगल्या गोष्टींना विरोध करणारे पुण्याचे
पालकमंत्री गिरीश बापट म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेवरील फार मोठे संकट आहे.
पुण्यातील सुजाण नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे संकट दूर करावे असे
आवाहन पुण्यातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. काँग्रेस भवनात
शनिवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना सर्वश्री संजय बालगुडे, रवींद्र माळवदकर, भाऊ करपे
आणि भोलेनाथ वांजळे आदी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला छेद
देणाऱ्या बापट यांच्या कारवायांचा पाढा वाचला.
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे
उमेदवार मोहन जोशी यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित करण्यासाठी आलेल्या या
पत्रकारपरिषदेत बोलताना प्रारंभी श्री संजय बालगुडे म्हणाले, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर
गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांनी पुण्याचे पालकमंत्री या नात्याने गणेशोत्सव काळात अनेक
सवंग घोषणा केल्या मात्र त्याची अम्मलबजावणी केली नाही. सार्वजनिक गणेशोत्सवात कमानी व
मंडपाचा खर्च राज्यशासन करणार असे जाहीर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात त्यावर चार
आणे खर्चही करण्यात आला नाही.
गणेशोत्सव काळात कार्यकर्त्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे प्रत्येक वर्षी
आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षात पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राजकीय कार्यकर्ते आणि दंगल स्वरूपाचे गुन्हे
ज्यांच्यावर आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले मात्र कार्यकर्त्यांवरील किरकोळ गुन्हे
मात्र तसेच ठेवण्यात आले असा आरोप बालगुडे यांनी केला. याउलट काँग्रेस सरकारच्या काळात
मोहन जोशी यांनी पुढाकार घेऊन अनेक कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते
याची बालगुडे यांनी आठवण करून दिली.
रवींद्र माळवदकर म्हणाले की, पुणे हि सांस्कृतिक राजधानी आहे हे विसरून जाऊन
अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध करण्याचे काम बापट यांनी सुरु केले आहे. सातशे वर्षाची
परंपरा असलेल्या पालखी सोहळ्यासाठी असलेल्या नागरी सुविधा बंद करण्याचे षडयंत्र रचले जात
आहे. त्यासाठी हभप बंडातात्या कराडकर यांना आंदोलनही करावे लागले होते. पुणे मनपातर्फे
होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यावरही बंदी घालण्यात आली आहे असे सांगून माळवदकर यांनी
गिरीश बापट म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेवरील फार मोठे संकट आहे व हे संकट दूर
करण्यासाठी सुजाण पुणेकर नागरिकांनी त्यांचा या निवडणुकीत पराभव करावा असे आवाहन
केले.
श्री भाऊ करपे यांनी सांगितले की, दरवर्षी गणेशोत्सव मंडळात वाद होतात मात्र त्यावर
पालकमंत्री या नात्याने सामंजस्याने तोडगा काढण्या ऐवजी गिरीश बापट नेहमीच
कार्यकर्त्याविरुद्ध भूमिका घेतात असा अनुभव आहे. पोलिसांच्या साक्षीने कार्यकर्त्यांना
धमकावण्याचा प्रकारही घडले आहेत असाही त्यांनी यावेळी आरोप केला.
मंडई गणपती मंडळाचे भोलेनाथ वांजळे म्हणाले, खूप वर्षांपूर्वी गिरीश बापट यांचा पहिला
पराभव हा एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानेच केला होता त्यामुळे या निवडणुकीत गणेश
मंडळांचे कार्यकर्ते बापट यांना नक्कीच धडा शिकवितील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.