भाजपच्या राजवटीत महापुरूषांच्या पुतळ्यांची विटंबना – रमेश बागवे (व्हिडीओ)
पुणे -भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर विविध जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्रिपुरात सत्ता आल्यानंतर त्यांनी लेनीन यांचा पुतळा पाडला. देशात विविध ठिकाणी महापुरूषांच्या पुतळ्यांची विटंबना करून देशात जातीय तणाव निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. या शब्दात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.
महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने काल शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वात पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या निषेध मोर्चाचा समारोप करताना बागवे बोलत होते. यावेळी माजी आमदार मोहन जोशी,गटनेते अरविंद शिंदे, आ. दीप्ती चौधरी, अॅड.अभय छाजेड, आदी उपस्थित होते.
बागवे पुढे म्हणाले, महात्मा गाधींनी देशाच्या एकता व अखंडतेसाठी आपल्या जिवाची आहुती दिली. तर आंबेडकरांनी समाजातील पीडित वर्गासाठी संघर्ष केला. अशा महान राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांची विटंबना करून जातीयवादी शक्तींनी देशात अशांतता पसरवली आहे. सरकारने या जातीयवाद्यांना वेळीच आळा घातला नाही तर जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.