भारताचा इतिहास इंदिरा गांधींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी देशासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळाता त्यांनी सिक्कीम देशाचे भारतात विलीनीकरण केले. 1971 सालच्या युध्दात त्यांच्याच कार्यकाळात भारताने अवघ्या तेरा दिवसात पाकिस्तानवर विजय मिळवत 90 हजार सैन्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. असे माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी दिली.
इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहर काँग्रेसच्या वतीने औंध येथील पंडीत भीमसेन जोशी कलादालन येथे इंदिराजींच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,अभय छाजेड, आमदार शरद रणपिसे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.
मोहन प्रकाश पुढे म्हणाले, ” इंदिरांजींनी वडील पंडीत नेहरुंसोबत स्वातंत्र्याच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांनी देशाची धुरा सांभाळली. समाजातील गरीब घटकांसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. गरिबी हटावचा नारा दिला. या छायाचित्र प्रदर्शनात इंदिराजींच्या जीवनातील अनेक दुर्मिळ चित्र पाहण्यास मिळाली. आजच्या पिढीने त्यांनी देशासाठी केलेला त्याग लक्षात घेत देश मजबूत करण्याचे काम करावे”