पुणे – आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत देशाचे नेतृत्व करताना अगदी सहजपणे जनसामान्यांच्यात मिसळणारा नेते अशी स्व. राजीव गांधी यांची प्रतिमा कशी निर्माण झाली याची साक्ष म्हणजे हे त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. स्व. राजीव गांधी यांच्या शिकवणुकीप्रमाणे आता काँग्रेसच्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वानीच जनसामान्यांच्या मिसळून विद्यमान राज्यकर्त्यांच्या चुका लोकांना दाखवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी आज येथे केले.
माजी पंतप्रधान स्वर्गिय राजीव गांधी यांची 75 वी जयंती येत्या 20 ऑगस्टला, मंगळवारी आहे. त्या निमित्ताने सारसबागे जवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात राजीव गांधी यांच्या जीवनातील विविध प्रसंगातील छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन करताना उल्हास पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे होते. नेते मोहन जोशी, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे, राजीव गांधी जयंती कार्यक्रमाचे निमंत्रक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, नगरसेवक अजित दरेकर, नीता रजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
गांधी कुटुंबियांनी पाच कलमी कार्यक्रम, वीस कलमी कार्यक्रमातून जी दिशा देशाला दाखवली, त्यावर टीका करणारेच आज तेच कार्यक्रम जाहीर भाषणातून देत आहेत, असे सांगून उल्हासदादा पवार म्हणाले, गांधीं कुटुंबातील नेत्यांना जे चाळीस वर्षापूर्वी दिसत होते ते कळायाला आजच्या राज्यकर्त्यांना इतकी वर्षे लागली. राजीव गांधी हे हस-या चेह-याचे, निर्मळ….प्रसन्न मनाचे आणि प्रांजळ विचारांचे नेते होते. त्यांनी पायलट म्हणून काम करताना ते जेवढ्या सहजपणे एअर इंडियामधील सहका-यांच्यात मिसळत होते तेवढेच सहजपणे ते पंतप्रधान झाल्यानंतर देशातील जनसामान्यांच्यात मिसळत असत हे सांगणारी अनेक छायाचित्रे या प्रदर्शनात आहेत.
या प्रदर्शनात राजीव गांधी यांची एकूण 130 छायाचित्रे लावण्यात आली असून त्याची सुरूवात त्यांच्या मुंबईतील त्या काळचे निष्णात प्रसुतीतज्ञ डॉ. शिरोडकर आणि डॉ. पुरंदरे यांच्या हॉस्पिटलच्या जन्म तारखेच्या दाखल्याने होते. याशिवाय त्यांचे आजोबा, आई, भाऊ आणि सोनिया गांधी, राहुल गाधी, प्रियांका गांधी यांच्या समावेतचे अनेक प्रसंग आहेत. दिल्लीत रस्त्यावर उभे राहून सोनिया गांधी समावेत आइसक्रिम खातानाचे छायाचित्र खूपच बोलके आहे. याशिवाय आजोबा पंडित नेहरू यांचा अस्थिकलश भाऊ संजय समावेत नेतानाच्या छायाचित्रात माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्रींचेही दर्शन होते. शेतकरी, आदिवासींच्या व्यथा ऐकणारे राजीव गांधी आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मंचावर नेत्यांसोबत बोलणारे राजीव गांधी इथेच दिसतात. प्रत्येक छायाचित्रात त्यांच्या चेह-यावरील वेगवेगळे भाव सहजपणे दिसतात. त्यांच्या विविध भाव मुद्रा बघितल्याकी आपण एका आश्वासक नेत्याला मुकलो आहोत याचीच जाणिव प्रदर्शन बघितल्यावर होते. या सर्व छायाचित्रांचे संकलन गेली 28 वर्षे मुक्त छायाचित्रकार सुशिल राठोड यांनी देशातील विविध प्रांतातून केलेले आहे. त्या काळात बहुतेक छायाचित्रे ही ब्लॅक ऍण्ड व्हाइट असल्याने मोठ्या मेहनतीने राठोड यांनी दुर्मिळ छायाचित्रे तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवंत केली आहेत.
हे प्रदर्शन सोमवार दि. 19 आणि मंगळवार दि. 20 पर्यंत सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत सारसबागे जवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात सर्वांसाठी खुले रहाणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे हा प्रदर्शन आयोजित करण्यात आले.