पुणे :”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवार, ११ मे २०१९ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत अलका टॉकीज चौकात राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने प्रतीकात्मक निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये इतर अनेक संघटना सहभागी होणार आहेत,” असे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक ,महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजीव गांधी स्मारक समितीचे प्रमुख गोपाळ तिवारी पत्रकार परिषदेत सांगितले भोला वांजळे, संदीप मोरे, नंदूशेठ पापळ आदी उपस्थित होते.
भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे आणि केंद्र सरकार शेवटच्या नागरिकांसाठी एक रुपया पाठवते, त्यातील पंधराच पैसे त्याला मिळतात. उर्वरीत ८५ पैसे कुठे जातात? असा स्पष्ट सवाल करीत भ्रष्टाचारी व्यवस्थेला खडेबोल सुनावणारे स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी हे पहिलेच पंतप्रधान होते. व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संगणकीकरण आणि इंटरनेटचा वापर त्यांनी सुरु केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य निराधार आणि निषेधार्ह आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर प्रामाणिकपणे बोलणाऱ्या राजीव गांधी यांच्याबाबत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून अशा प्रकारचे बदनामीकारक वक्तव्य करीत खोटा कांगावा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य खेदजनक आहे,” अशी टीका त्यांनी केली
गोपाळ तिवारी म्हणाले, “व्यवस्थेतील वास्तव सांगण्यासाठी राजीव गांधी यांनी ते वक्तव्य केले होते. केंद्र सरकार राज्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये, जनतेच्या विकासासाठी एक रुपया पाठवते, तेव्हा ८५ पैसे शासकीय कारकून, अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी या साखळीत विरतात. अनेक वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व बेपर्वा विरोधक यांचा बऱ्याचदा वरदहस्त असतो. त्यावेळी भ्रष्टाचारावर बोलण्याची एकही विरोधी पक्षनेत्यांत धमक नव्हती. कारण तेही त्यात सामील होऊन, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करून मलाई खात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजीव गांधी यांनी जनतेला जागरूक करण्यासाठी राजधर्माचा पुरुषार्थ दाखवला. तत्कालीन स्वार्थी, स्वतःची तुंबड्या भरणाऱ्या विरोधकांनी भ्रष्टाचारावर आवाज उठवला असता, तर राजीवजींवर हे कटू सत्य मांडण्याची वेळ आली नसती. अकार्यक्षमतेच्या मुद्यावर सरकारी अधिकाऱ्याची बडतर्फी करण्याचा कायदा आणण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, याच भाजपच्या, तत्कालीन जनसंघाशी सलग्नीत भारतीय मजदूर संघाने विरोध करीत राजीवजींचा भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न हणून पाडला.”
“राजीवजींच्या भ्रष्टाचारविरोधी प्रयत्नांमुळे अनेकांचे भ्रष्टाचार उघड्यावर आल्याने त्यांच्या हत्येमागे काही देशांतर्गत शक्तींचा सहभाग असल्याचा संशय वाटतो. तेव्हाचे विरोधक आता सत्ताधारी बनले आहेत. भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम त्यांनी त्यावेळी केले. राजीव गांधी त्यांचा बुरखा फाडल्याने आज हे लोक राजीवजींच्या वक्तव्याची मोडतोड आणि चुकीचा अर्थ काढून मोदी खोटे आरोप करून आग ओकत आहेत. मात्र, राजीवजींच्या भूमिकेमागील वास्तव जनतेला माहित आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये,” असे गोपाळ तिवारी यांनी सांगितले.