पुणे-‘राजीव गांधी हे मिस्टर क्लीन असल्याचे सुरूवातीला सांगितले जात राहिले आणि ‘भ्रष्टाचारी नं. 1’ अशी त्यांची जीवनाची अखेर झाली’ अशी विपर्यस्त आणि जहरी टीका दुसर्यांदा पंतप्रधानपद मिळावे यासाठी वेडेपिसे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याचा काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो. सर्व शहिदांना सदैव वंदन करणारा प्रत्येक भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा धिक्कार करेल ही खात्री व्यक्त करतो. देशातील जनता आता आपल्याला झिडकवणारं आणि सत्ताबदल झाल्यानंतर राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचार उघड होईल या भितीने गांगरून गेल्यामुळेच ते अशी बेछूट विधाने करीत आहेत असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत गेल्या 5 वर्षात आपल्या सरकारने काय केले हे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने जनतेला सामोरे जायला हवे होते. मात्र देशापुढील कोणतेच प्रश्न सोडवता न आल्यामुळे वैयक्तिक खालच्या पातळीवरील टीका करीत वणवण भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहीद पंतप्रधान राजीव गांधींवरील टीका हा असाच वैफल्यग्रस्तेतून केलेला प्रयत्न आहे. 1984-85 मध्येच देशात संगणक क्रांती करून आधुनिक भारताचा पाया रचणार्या कर्तबगार पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशासाठी बलीदान दिले, देशासाठी ते शहीद झाले. राजकीय हेतुने प्रेरीत होऊन त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपामधूनही न्यायालयाने त्यांची मरणोत्तर निर्दोष मुक्तता केली. हा इतिहास माहित असूनही पुन्हा पंतप्रधानपद मिळावे त्यासाठी उताविळ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवर अशी टीका करून शहीदांचा अपमानच केला आहे.
शहीदांचा अपमान करायचा ही भाजपची विकृत संस्कृती आता लपून राहिली नाही. भोपाळमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी देखील महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांना त्यांनी शाप दिल्यामुळेच ते मारले गेले असे बेताल वक्तव्य केले होते. शहीद पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले द्वेषाने भरलेले विधानही हीच विकृत परंपरा दाखवते. विशेष म्हणजे पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मते मागताना याच पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजिबात वावगे वाटले नाही. ‘काहीही करा पण मला पुन्हा पंतप्रधान करा’ असा आक्रोश करीत ते सध्या देशभर फिरत आहेत. 23 मे रोजी देशातील जनता मात्र या अपयशी आणि हुकूमशाही वृत्तीच्या पंतप्रधानांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही आणि ‘सर्वात अपयशी पंतप्रधान’ अशी नोंद त्यांच्याबद्दल इतिहासात कायमची नोंदवली जाईल हे निश्चित.