पुणे-पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचा साठा सुमारे ७ टीएमसी एवढा राहिला असून २ मेनंतर पुणेकरांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. पुण्याच्या पाणी पुरवठ्याचा खेळ खंडोबा करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांनी त्यांची अकार्यक्षमता लक्षात घेऊन त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी केली आहे.
ते म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेत कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना पाण्याचे उत्तम नियोजन केल्यामुळे पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही. मात्र अकार्यक्षम पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाण्याच्या नियोजनाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे आता दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ पुणेकरांवर येणार आहे. गेल्या ५ वर्षात पालकमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द
पूर्णपणे अपयशी ठरली असून त्याचे दुष्परिणाम पुणेकरांना भोगावे लागत आहेत.
विशेष म्हणजे, पुण्यातील मतदान २३ एप्रिल रोजी झाले तर पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदार संघात येतो, तेथे २९ एप्रिल रोजी मतदान आहे. पालकमंत्री बापट यांच्या निष्क्रियतेमुळे पुणेकरांवर पाणी कपात लादावी लागणार आहे व त्याचा मतदानावर प्रतिकूल परिणाम होईल हे लक्षात घेऊन पुण्याची पाणी कपात २ मेपासून करण्याची चलाखी या निष्क्रिय पालकमंत्रांनी केली आहे . पुणेकरांबद्दल त्यांना अजिबात आस्था नाही ,हे त्यांनी यावेळी देखील दाखवून दिले आहे. तूरडाळ खरेदी घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही’हिरवा देठ’ सारखे संस्कृतीहीन जाहीर विधान करूनही आणि पुण्याच्या
प्रश्नांबाबत निष्क्रिय राहूनही मुख्यमंत्र्यांपुढे केलेल्या लांगुलचालनामुळेच स्वतःचे मंत्रीपद ते टिकवू शकले. आता मात्र पुणेकरांनी त्यांचा राजीनामा मागावा कारण अशा निष्क्रिय आणि झोपी गेलेल्या चौकीदाराचा पुणेकरांना काही एक उपयोग नाही हे निश्चित आहे.असे मोहन जोशी यांनी आहे .