पुणे-मोदी सरकारच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून ती
रुळावर आणण्यासाठी काँग्रेसने अनेक योजना आखल्या आहेत. सत्तेवर आल्यावर
देशातील पाच कोटी अति गरीब कुटुंबाना ‘किमान उत्पन्न हमी योजना (न्याय)’
द्वारे दरमहा ६ हजार रुपये म्हणजे वर्षाला ७२ हजार रुपये दिले जातील. ही
रक्कम त्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.ही योजना
कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहचवली पाहिजे असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यात
कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले पुण्यातील काँग्रेस पक्षाचे .नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष
आणि फ्रंटल अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस काँग्रेसचे राजकीय सल्लागार व ज्येष्ठ विचारवंत सॅम पित्रोदा, प्रदेश
अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,.ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण, अ. भा. काँग्रेसच्या चिटणीस आणि प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी
सोनल पटेल, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप , आमदार विश्वजित कदम,
आमदार संग्राम थोपटे तसेच शहर काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, या योजनेसाठी निधी उभा रहाणं सहज शक्य आहे.
देशातील करदात्यांनी सरकारकडे दिलेल्या पैशाला हात न लावता, देशाबाहेर पळून
गेलेल्या तसेच अन्य करबुडव्या उद्योगपतींनी बुडवलेले पैसे वसूल करून या
योजनेसाठीच्या पैशाची तरतूद केली जाईल असे ते म्हणाले. तसेच लघु
उद्योगांना चालना देण्यासाठी छोट्या व तरुण लघु उद्योजकांना पहिल्या तीन
वर्षासाठी कोणत्याच परवान्याची गरज लागणार नाही असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की संपूर्ण देशाचा विचार करता सध्याची लोकसभा निवडणूक
खूपच महत्वाची आहे, मुंबई सारखेच मोठे महत्त्व पुणे शहराला आहे. पुणे लोकसभा
मतदार संघाची निवडणूक ही काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. येथे
कार्यकर्त्यास उमेदवारी दिलेली असून ही जागा जिंकलीच पाहिजे यासाठी सर्व
काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र
पक्षाचे उमेदवार , मोहन जोशी यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे असे
आवाहन त्यांनी शेवटी केले.
याप्रसंगी पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र
पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी पुण्यातील उमेदवारी कार्यकर्त्याला
दिल्याबद्दल पक्षाध्यक्ष राहुल गांधीचे आभार मानले. प्रारंभी प्रदेश अध्यक्ष
व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. तर माजी मंत्री
हर्षवर्धन पाटील यांनी राहुल गांधींचे आभार मानले.