मुंबई-. भाजपकडून साम, दाम, दंड, भेदाचं राजकारण केलं जात असून या राजकारणाला काही बळी पडत आहेत, अशी तोफ आज येथील महा आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी डागली. राज्य आणि केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर कसं अपयशी ठरलं आहे, याचा पाढा वाचताना युतीचे मंत्री जुमलेबाज आहेत, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. यावेळी अजित पवार यांनीही युतीवर निशाणा साधताना युतीचे २५ टक्के उमेदवार आयात असल्याचे सांगितले. युतीचा पराभव करायचा असेल तर मतभेद विसरून आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल, असेही अजित पवार म्हणाले.
भाजपकडून साम, दाम, दंड, भेदाचं राजकारण- अशोक चव्हाण
यावेळी जोगेंद्र कवाडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना आरएसएसच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे मनुवादी सरकार हद्दपार करण्यासाठी आपण महाआघाडीत आलो असल्याचे सांगितले. आम्ही दोन जागांची अपेक्षा केली होती. मात्र, या जागा मिळाल्या नसल्या तरी व्यापक हितासाठी आम्ही महाआघाडीत जाण्याचा निर्णय घेतला, असेही कवाडे पुढे म्हणाले. यावेळी राजू शेट्टी यांनी भाजपवर जोरदार प्रहार करताना ‘कमळाचं बीज समूळ नष्ट करायला हवं’, असं सांगितलं.
कॉंग्रेस २४ जागांवर तर राष्ट्रवादी २० जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन विकास आघाडीला १ जागा, स्वाभिमानीला २ जागा तर युवा स्वाभिमानी पक्षाला १ जागा देण्यात आली आहे. महाआघाडीच्या जागावाटपावर यामुळे आता शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी ही घोषणा केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पिपल्स रिपब्लिक पार्टी कवाडे गट, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पार्टी, ऑल इंडिया विमुक्त भटक्या जाती जमाती, आरपीआय डेमोक्रॅटीक, स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष, भीमसेना, युनायटेड रिपब्लिक पक्षा, गणराज्य संघ, इंडियन डेमोक्रॅटिक अलायन्स, महाराष्ट्र मुस्लिम संघ, आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र परिवर्तन सेना, स्वाभिमान रिपाईं, आरपीआय खरात गट हे सगळे पक्ष महाआघाडीत सहभागी झाले आहेत.