देवेंद्रजी,
मटका बंद नाही झाला , अवैध दारूचे धंदे बंद नाही झाले आणि पोलिसी अत्याचाराच्या घटनाही बंद नाही झाल्या … देवेंद्र आपले नाव .. नरेंद्र जींच्या अधिपत्याखाली, महाराष्ट्रातील सत्तेचे सारथ्य आपणाकडे ..कॉंगेस अगर या पूर्वीच्या राजवटीचे सोडा .. पण आपल्या राजवटीत तरी चांगली अपेक्षा जनतेने केली होती . महागाईचा अंत , भ्रष्टाचाराचा अंत , सुस्थितीतील कायदा सुव्यवस्था , स्वच्छ शासन ,पारदर्शक शासन अशा सर्व गोष्टी आज ही सामान्य, किंवा गरीब माणसाच्या दृष्टीने केवळ कागदावरच आहेत . ‘बळी तो कानपिळी’ म्हणा किंवा ‘ज्याच्या हातात ससा तोच पारधी’ म्हणा या परिस्थितीत काही सुधारणा झाली असे म्हणायला वाव नाही .निव्वळ जाती पातीच्या दऱ्या वाढवून किंवा अन्य ‘बांडगुळे’ उभी करून या खऱ्या दुराव्स्थेकडील लक्ष विचलित करण्याचे काम आपली सत्ता असतानाही होत असेल तर …? सत्ता कोणाची ही असो , जनतेच्या व्यथेत मात्र फरक पडत नाही ..हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत राहते .
अर्थात सांगलीतील आपल्या पोलिसांच्या सैतानी कृत्याबद्दल तुम्हालाच जाब विचारला जाणार आहे .असा प्रकार पूर्वीही होत होताच ,पण तो आपल्या कारकिर्दीत देखील थांबलेला नाही हे या आणि या आणि अशा काही घटनांनी सिद्ध झाले आहे .
खरे गुन्हेगार, गॅंगवॉरमधील दादा यांच्यासह निष्पापांवर मस्तवाल अधिकाऱ्यांची दादागिरी आजही चालते आहे .हाणून मारून गुन्हे काबुल घेण्याचे सत्र पोलिसांकडून आज ही होते आहे हे देखील स्पष्ट होते आहे . अशा प्रकारे निष्पापांना गुन्हेगार बनविण्याचे षड्यंत्र राबविण्याऐवजी, चातुर्याने गुन्हेगार पकडणे गरजेचेच राहिलेले नाही. कारण गुन्हेगार हे पोलिसांना ठावूकच असतात असा दावा निरर्थक होणार नाही .बहुतेक ठिकाणी गुन्हेगार आणि पोलीस यांची हातमिळवणी झालेलीच असते . फक्त ‘बळीचे बकरे’ करण्यासाठी थर्ड डिग्रीचे वापर होत असतो असेही म्हणता येणार आहे . . नशीब विश्वास नांगरे पाटलांनी हे क्रोर्य बाहेर काढले आणि चव्हाट्यावर मांडले ..पण नांगरे पाटील एखादाच असतो .. हे देखील आपण ध्यानात घ्यायला हवे .
सांगलीतला प्रकार उघड झाला , म्हणजे अन्यत्र असे प्रकार उघड होत नाहीत असे कोणी समजू नये . सगळ्यांना आपापल्या परिसरातले दारूचे धंदे, मोकाट गुन्हेगार , मटक्याचे अड्डे ठावूक असतात . पण जिथे पोलिसांचीच हात मिळवणी असते, त्यांच्या सहकार्याशिवाय गुन्हेगारी फोफावू शकत नाही हि सत्यता आपण नाकरू शकणार नाही .आणि मग तिथे जनता भाबडी अत्याचारग्रस्त ठरते . त्यामुळे थर्ड डिग्री हा प्रकारच खरे तर तपास यंत्रणेला मान्यता न देणारा प्रकार आहे . आता यापुढेही जावून आपण चकमकी करतो .. भारताची घटना तशी मजबूत आहे . कोणताही गुन्हेगार त्यातून सुटून जावू शकत नाही , पण भ्रष्टाचार , दहशतवाद यामुळे हा कायदा विलंब घेतो..वा निष्प्रभ ठरतो . आणि हि सत्य स्थिती आहे म्हणून शासन दरबारातली मंडळी थर्ड डिग्रीला , चकमकींना मूक मान्यता देण्यात धन्यता मानत आली आहे . हि खरे तर सत्यवादी घटनेची पायमल्ली आहे, जी आपल्या राज्यात आपल्याही कारकिर्दीत होते आहे . आज आपण सत्ताधारी असून या परिस्थितीत बदल करू शकलेला नाही किंवा त्याबाबत काही प्रयत्न करू शकलेला नाहीत . त्यामुळे कदाचित उद्या विरोधक म्हणून जरी महाराष्ट्रात आपण दिसलात तरीही अशा गोष्टींबाबत आक्षेप घेण्याचा आपल्याला नैतिक अधिकार उरणार नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे . तेव्हा आता तरी या सांगलीतील घटनेची गंभीर दाखल घ्या , उज्वल निकम सारखा धडाकेबाज वकील द्या पण त्यांनाही सांगा माफीचा कोणी साक्षीदार न करता .. थेट लवकरात लवकर पोलिसातील अशा नराधम प्रवृत्तींना फाशी वर पोहोचवा .. एवढे करा ..म्हणजे किमान आपल्या मनाला तरी मानसिक समाधान राहील कि परिस्थिती बदल होवो किंवा न होवो पण अशा नराधमांना थेट त्यांची जागा दाखविली … अन्यथा आपल्या कारकीर्दीवर ही असे कलंक आपल्या आणि जनतेच्या मनाला कायमचे चिकटून राहतील .
सांगलीत पोलिस विभागाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोलिस कोठडीत पोलिसांनी दिलेल्या थर्ड डिग्रीत आरोपीचा मृत्यू झाला. इतकेच नाही तर आरोपी पळून गेल्याचा बनाव करत पोलिसांनीच आंबोली घाटात पेट्रोल ओतून जाळून तरुणाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अनिकेत कोथळे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे.