पुणे- मुख्यमंत्री पुण्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप आज पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे .मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या प्रश्नांवर ४ महिन्यापूर्वी आदेश देवूनही कारवाई झाली नाही याचा अर्थ काय घ्यायचा ? असाही सवाल महापौरांनी केला आहे .
त्यांनी यासंदर्भात म्हटले आहे कि मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना आज पुण्यातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आम्ही पुन्हा निवेदन दिलं. आमचे नेते शरद पवार साहेब आणि अजितदादा यांच्या उपस्थितीत १३ मे रोजी पुण्यात विविध प्रश्नांसंबंधी बैठक घेऊन, आवश्यक त्या कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण गेल्या चार महिन्यात यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचं दिसून आलं नाही.विशेष म्हणजे हे प्रलंबित प्रश्न पुणेकरांच्या पुढील पाच दशकांच्या जीवनमानाशी निगडीत असल्यानं, ते वेळेत मार्गी लागणं आवश्यक आहे. ऐन डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेतल्यास, त्या निर्णयांची आचारसंहितेमुळे अंमलबजावणी करणं शक्य होणार नाही. तरी पुढील १०-१५ दिवसांमध्ये यासंबंधी निर्णय घ्यावा, ही विनंतीही फडणवीसजी यांना केली.