कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये महामानवास अभिवादन
पुणे- समाजामध्ये सातत्याने विसंगत वातावरण असल्यामुळे त्याच्यावर तोडगा म्हणून जातीअंत अपेक्षित असतानाही जातीयता संपुष्टात येत नसल्याने आजच्या समतेच्या काळात जातीअंतासाठी सामाजिक समतेच्या अपेक्षित वातावरणाची गरज असल्याचे मत कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रोफेसर व राष्ट्रीय समाजशील शिक्षण मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.
कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापारीनिर्वान दिन व महात्मा जोतीबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संयुक्त अभिवादन कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर हे होते तर प्रा. चेतन दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांपासून ते आजच्या वंचित समाजाला जातीयतेचे चटके सहन करावे लागले व दुर्दैवाने आजही सहन करावे लागतच आहेत यातून मुक्तता हवी असेल तर समाजशील शिक्षण व संघर्ष याला प्राधान्य द्यावे लागेल असे सांगत या विभूतींच्या विचाराबरोबरच त्यांना सर्वार्थाने समजून घेऊन मार्गक्रमण केल्यास अपेक्षित सामाजिक परिवर्तन फार दूर असणार नाही असेही ते म्हणाले.राष्ट्रभक्ती, सौजण्याशिलता, संवेदनशीलता, उदात्तपणा, सामाजिक अद्सारांचे निर्मुलन, रोजगार, हक्क, लोकशाही, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता हे समाजशील शिक्षणाचे मुख्य घटक बळकट व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. वलोकर म्हणाले, समाजातील वर्ग व्यवस्था व जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे त्यासाठी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा अंगीकार केला पाहिजे.
अमोह साठे, विजया कावळे व विजय गावंडे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. राहुल गिरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अक्षय शिंगारे यांनी सूत्रसंचालन केले तर रसिका शिंदे यांनी आभार मानले.