मुंबई -८ नोव्हेंबरला नोटा बदलल्या ,पण परिस्थिती कोणाची बदलली ? सामान्य माणसाच्या पदरात काय पडले … असे प्रश्न करत ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेसकडून ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात यावा आणि यानिमित्त देशव्यापी आंदोलनही करण्यात यावे यासाठी कॉंग्रेस पक्षाने हालचालींना प्रारंभ केला आहे .
मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे केवळ सामान्यांवरच काटकसर करण्याची वेळ आली असे नव्हे तर अर्थव्यवस्थेलाही मोठा झटका बसला, असा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला संध्याकाळी अचानकपणे नोटाबंदीची घोषणा करत ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे देशभरात तब्बल महिनाभर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्यांचे खूप हाल झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने ८ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळायचे ठरवले आहे. त्यानुसार काँग्रेस नेते आणि प्रवक्ते देशभरात फिरून नोटाबंदीच्या दुष्परिणामांचा प्रचार करतील. तसेच नोटबंदी कशाप्रकारे अपयशी ठरली, हे दाखवून देण्यासाठी पक्षाच्या रिसर्च टीमकडून व्यापक प्रमाणावर माहिती गोळा करण्यात आल्याचे समजते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदी म्हणजे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे पाऊल, असे निर्णयाचे वर्णन केले होते. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदी म्हणजे ‘महाकाय गैरव्यवस्थापन आणि संघटित व कायदेशीर लूट’ असल्याची टीका केली होती.