मुंबई- राज्यात सत्ता संघर्ष शिगेला पोहचला आहे. भाजप मुख्यमंत्री पदावरून आपला हक्क सोडण्यास तयार नाही तर दुसरीकडे शिवसेनेनही मुख्यमंत्री पद दिल्याशिवाय चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. या बैठकीनंतर आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ”मला स्वतःहून युती तोडायची नाही. भाजपने त्यांचा निर्णय घ्यावा. लोकसभेवेळी जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. भाजप अध्यक्ष अमित शाहा यांच्यासोबत सगळे ठरलं होतं. सत्तेचे समान वाटप हा फॉर्म्युला होता. युती कायम राहावी हीच इच्छा आहे. मात्र भाजपनं दिलेला शब्द पाळावा. ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असाल तरच भाजपने फोन करावा,” अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे.