मुंबई: दिल्लीतून निरोप येताच शिवसेना आपला आग्रह बाजूला ठेवून अखेरीस सत्तेत सहभागी होईल असे सांगण्यात येत असले तरी शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या सुरू असलेलं वाकयुद्ध अजून थांबण्याचं नाव घेत नाही. भाजपचे वरिष्ठ नेते अद्याप संयम राखून आहेत. भाजप-शिवसेना युतीतील तणावाचं वातावरण निवळेल, या प्रतीक्षेत ते आहेत. संख्याबळाच्या आधारावर सत्तेत वाटा आणि समझोता होईल, असं त्यांना वाटतं. एका भाजप नेत्याच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे येत्या ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ‘लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता. तसे आश्वासन दिलेच नव्हते’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केल्याने खळबळ उडाली होती. ‘शिवसेनेने अजून कोणताही प्रस्ताव दिलेला नसून, त्यांच्या प्रस्तावावर मेरिटनुसार विचार केला जाईल. त्यांच्या योग्य मागण्या मान्य केल्या जातील’, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानांनंतर शिवसेना आक्रमक झाली असून, पक्षाने मंगळवारी जागावाटपाबाबत होणारी युतीची बैठकच रद्द केली .
भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्याचा कारभार चालवणार असं शिवसेनेला ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस हे येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर सध्या ठाम असलेली शिवसेना एक पाऊल मागे घेईल, अशी भाजपची अपेक्षा आहे.
सरकार स्थापनेचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता
भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष सुरू असतानाच, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांची बुधवारी भाजप आमदारांच्या होणाऱ्या बैठकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या बैठकीत फडणवीस यांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापन करण्याचा प्रस्तावही ठेवणार आहेत, असं सांगितलं जातं.