पुणे-महापालिकेत ,राज्यात ,केंद्रात भाजपची एक हाथी सत्ता असताना येथील विद्यमान आमदारांचे प्रगती पुस्तक कमकुवत ठरल्याने येथे उमेदवार देताना नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे. लष्कर विधानसभा मतदार संघातील कांबळे बंधूंच्या कुंडल्या मांडून कार्यकर्त्यांनी महापौर बंगल्यात(आचार संहिता काळात ) झालेल्या बैठकीत थेट विरोध केला .त्यामुळे आता लष्कर चे तगडे आव्हान समोर असताना ,कसबा आणि कोथरूड हे दोन्ही मतदार संघ भाजपचे बालेकिल्ले असल्याच्या बोलले जात असले तरी आता या दोन्ही मतदार संघात देखील भाजपच्या जे कोणी येतील त्या त्या उमेदवारांची कसोटी लागणार आहे .येथील मतदार संघातून विजय मिळविणे सुद्धा आता सहज सोपे उरणार नाही असे दिसते आहे. कोथरूड मधून तर राष्ट्रवादी चे नेते अजीत पवार यांनी हा मतदार संघ मित्र पक्षाला सोडण्याचा स्पष्ट इशारा अण्णाभाऊ साठे सभागृहातील एका कार्यक्रमात दिला होता .आता कुलकर्णी -मोहोळ या संघर्षात कोथरुडकर वैतागलेले असताना स्थानिक जुना सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता सोडून थेट चंद्रकांत दादा पाटलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ,अजीतदादांचा उमेदवार इथे कोण असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. चंद्रकांत दादा विरुद्ध अजीत दादा यांनी दिलेला उमेदवार या लढतीत कोथरूड चा बालेकिल्ला राखणे भाजपला सोपे राहणार नाही असे बोलले जाते आहे . दीपक मानकर सारख्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला रिंगणाबाहेर ठेवण्यास यश मिळवूनही येथील भाजपला येथील लढती साठी शर्थ करावी लागते आहे हेच त्यांच्या उमेदवारी बदलाबदली बाबतच्या हालचालीवरून स्पष्ट होते आहे.
पुण्याचे नेतृत्व ना बापटांकडे ,ना काकडेंकडे …आता कोल्हापूरच्या पाटलांकडे …?
चंद्रकांत दादा पाटील यांना येथून भाजप उमेदवारी देईल असा इशारा देणारे वृत्त २० सप्टेंबर रोजीच ‘माय मराठी’ ने दिले होते .मात्र त्यावेळी येथील स्थानिक नेतृत्वाने ते गंभीरतेने घेतले नाही .त्याचे परिणाम आता पुण्यावर ना बापट ,ना काकडे ,यांचा वरचष्मा ठेवायचा तर थेट कोल्हापुरातील पाटलांच्या हाथी पुणे द्यायचे असा पक्ष नेतृत्वाने इरादा केल्याचे दिसते आहे.पुण्याचे नेतृत्व पुणेकरांच्या हाथी न देता ,अन्य उमेदवार देखील प्रगती पुस्तकात नापास असले तरी ‘ताटाखालचे’ राहू शकतील अशा पद्धतीने निवडले जात असल्याची ओरड होते आहे. भाजपने पाटील यांच्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघ निश्चित केल्याच्या बातम्या आठ दिवस उशिरा अन्य माध्यमांनी दिल्यानंतर पाटील यांच्या उमेदवारीने मतदारसंघातील भाजपच्याच कार्यकर्त्यात अस्वस्थता पसरली आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे पुणे भाजपमध्ये एका दगडात अनेक पक्षी मारले जाणार असल्याने अनेकांना आपल्या राजकीय इच्छा-आकांक्षांना तिलांजली द्यावी लागणार आहे. त्यातच शिवसेनेनेही पाटील यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे आक्षेप घेत थेट आव्हान दिल्याने पाटील यांच्यासाठी शहर भाजपला मोठी कसरत करावी लागणार असल्याची चर्चा सोमवारी दिवसभर शहरात होती.
मागील विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवित आठही मतदारसंघात कमळ फुलवले. त्यात शहर संघटनेचा मोठा वाटा होता. प्रामुख्याने या विजयानंतर पुणे भाजपची सर्व सूत्रे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या हातात होती. तर, या विजयाने बापट यांच्याकडेच शहराचे नेतृत्व आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बापटांच्या गळ्यात खासदारकीची माळ गेल्याने पुण्याचे पालकमंत्री पद तसेच अप्रत्यक्षपणे शहराचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत चर्चांना उधाण असतानाच पुण्यातील भाजप आमदारांना संधी न देता थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पद देण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुका असल्याने ते तात्पुरते दिल्याचे सांगत वेळ मारून नेत शहर भाजपमधील नाराजी टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पाटील यांच्या या निवडीला भाजपमधूनच विरोध होत असून ‘दूरचा नको घरचा पाहिजे; आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ – आम्ही कोथरूडकर असे पोस्टर मतदारसंघात झळकविण्यात आले आहेत. महर्षी कर्वेंच्या पुतळ्याच्या रेलिंगवरच हे पोस्टर लावण्यात आहे. हे पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी लावले, की विरोधकांनी? याबाबत संभ्रम आहे. तर, हा विरोधकांचा खोडसाळपणा असल्याचा दावा भाजपचे शहरातील नेते करत असले तरी हे पोस्टर काढण्याची तसदी शहर भाजपने घेतलेली नाही. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीबाबत काहीच आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
ब्राह्मण महासंघाचाही विरोध
पाटील यांच्या निवडीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानेही विरोध केला असून समाजाला विरोध करणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात गरज पडल्यास ब्राह्मण महासंघाकडून उमेदवार उभा करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला आहे. दवे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ‘ब्राह्मण समाज नेहमीच भाजपच्या बरोबर राहिला आहे. मात्र, जातीय आरक्षणाचे राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे की नाही, याचा विचार करावा लागेल. त्यामुळे आमच्या समाजाला गृहीत धरणाऱ्यांबाबत विचार करावा लागेल.’