पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावावर ४ दिवसांपूर्वीच शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे .त्यानंतर बापट यांनी पुण्यात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या निवडक लोकांशी एका बड्या हॉटेलात स्नेहभोजन कार्यक्रम केल्याचे कळते. येणाऱ्या दोन दिवसांत बापटांच्या नावाची घोषणा होण्याची चिन्हे आहेत.विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना टाळून बापटांच्या नावाला राज्याच्या निवड मंडळातील पक्षनेत्यांनी कौल दिल्याची माहिती येथे मिळते आहे.याबाबत शिरोळे यांना संपर्क करूनही ते आता यावर बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते.मात्र अशीच स्थिती २०१४ ला हि झाली होती त्यावेळीही बापटांनी सर्व तयारी केली होती आणि ऐन वेळी शिरोळे यांना उमेदवारी दिली गेली .आता शिरोळे यांचा पर्फोर्मान्स पाहूनचं त्यांना नाकरले जातेय असा दावा केला जातोय .
राज्यातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे पक्षाच्या मुख्य कार्यालयात बैठक नुकतीच झाली. बरेच तास ही बैठक चालली. राज्यातील बहुतांश मतदारसंघातील उमेदवार या नेत्यांनी बैठकीत निश्चित केल्याचे सांगण्यात आले.खुद्द बापट या दिवशी दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांच्याशी या समितीने चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुपारी चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यांचा क्रमांक रात्री उशिरा आला. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तेथेच त्यांना उमेदवारीसाठी `ग्रीन सिग्नल` मिळाला.बापट यांच्या नावाचा विशेष आग्रह नितीन गडकरी यांनी धरल्याचे समजते. बापट यांचे नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यापूर्वी सर्व संबंधितांना विश्वासात घेण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.प्रदेश भाजपने तब्बल सहा नावे पुण्यासाठी सुचविली होती. त्यात बापट, विद्यमान खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले हे नेहमीच्या चर्चेतील नावे होतीच. तसेच नवीन चेहरा म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचेही नाव सुचविले होते. इतर दोन नावे मात्र आश्चर्य व्यक्त करावी, अशी होती. त्यात निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांचा समावेश होता. मुळे यांची वरिष्ठ भाजप नेत्यांकडे उठबस गेल्या महिन्यांत उठबस वाढली होती. त्याचाच परिणाम म्हणून मुळे यांचे नाव यादीत होते.
दुसरे नाव हडपसर येथील भाजप नेते विकास रासकर यांचे होते. रासकर हे खरेतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदार आहेत. तरीही त्यांचे नाव पुण्याच्या यादीत होते. खुद्द रासकर हे पुणे नव्हे तर शिरूरमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. शिरूर हा शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी बारामतीसाठी आग्रह धरला आहे. तरीही त्यांचे नाव पुण्याच्या यादीत होते.या साऱ्या नावांतून बापट यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. बापट यांनी 1996 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात ते काॅंग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांच्याविरोधात पराभूत झाले होते. ते 2014 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून लोकसभेवर जाण्याच इच्छुक होते. तेथे त्यांना डावलून शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. आता बापट यांची जुनी इच्छा पूर्ण करण्याचे पक्षाने ठरविल्याचे दिसून येते आहे.
(राजकारणात अखेरच्या क्षणापर्यंत कधी काय होईल सांगता येत नाही , पक्षाची दोघा-दोघांना अधिकृत उमेदवारी ऐनवेळी दिल्याचे प्रकार हि यापूर्वी दिसून आलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत पक्ष अधिकृत उमेदवारी देत नाही तोपर्यंत राजकीय वर्तुळातील वातावरणाच्या या बातम्या वाचकांनी आपपल्या परीने विचारात घ्याव्यात.mymarathi.net)