पुणे-आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ जागा लढवणार आहोत. मागच्यावेळी ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामती असेल. बारामतीमध्ये कमळ फुलवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत.
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामतीमधील जागा गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार. शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, देशात काही जण मुलाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी नाव न घेता सोनिया गांधी यांच्यावर टीका केली
मागील मनमोहन सिंग यांचे सरकार फक्त येणारे दिवस काढत होते. कोणतेच काम करत नव्हते. कोणतेही निर्णय घेत नव्हते. मात्र पंतप्रधान मोदी एकही दिवस न शांत बसता अविरत काम करत आहेत. एकविसाव्या शतकातील भारताची मुहुर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी यांनी रोवली. मात्र दहा वर्ष आलेल्या काँग्रेसच्या राजवटीने देशाचा विकास रोखला. आज मोदी यांनी पुन्हा देशाला विकासाच्या मार्गावर आणून ठेवले आहे. जगातील प्रत्येक देश आज भारताची एकविसाव्या शतकाकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे म्हणत आहेत. नुकतेच सादर झालेला केंद्राचा अर्थसंकल्प अनेक वर्ष भारतावर प्रभाव पाडणारा आहे. भविष्यातील भारताचे चित्र दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आमचा बुथप्रमुख छत्रपतींच्या मावळ्यासारखा आहे. याच मावळ्याच्या जिवावर आम्ही लढाई जिंकणार आहोत. अफजल खान जरी आज जिवंत नसला तरी अफजल खानाच्या प्रवृत्तीचे लोक आज आहेत. त्यामुळे आज आपणास या अफजल खानांचा पराभव करून निवडणूकरुपी लढाई जिंकायची आहे. त्यामुळे बुथप्रमुखांनी मावळ्यांसारखे काम करून आपापले बुथ संभाळले पाहिजेत.
आम्ही कुणाला आमदार, खासदार करण्यासाठी लढत नाही तर देश आणि देशातील नागरिकांसाठी लढणार आहोत. पुणे शहरही बदलण्याचे काम आम्ही केले आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधानांची जागा रिक्त नाही : दानवे
लोकसभा निवडणूकीत २०१४ पेक्षा जास्त कष्ट करून २०१९ च्या पुन्ही मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या बळावर मागच्यावेळी जिंकलेल्या ४२ जागांपेक्षा एक जागा जास्तच जिंकू. देशातील गरीबांसाठी मोदींनी गेली पाच वर्षात काम केले आहे. कॉग्रेसचेच सरकार शेतकरी विरोधी होते. पाच वर्षात आम्ही सर्व सत्ताकेंद्रे काबीज केल्याने सर्व विरोधक एकत्र येत आहेत. मात्र, प्रधानमंत्रिपदाची जागाच खाली नाही. त्यामुळे विरोधकांचे घोडे मध्येच थांबणार आहे. विकासाकडील लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी आम्ही राज्यघटना बदलणार असल्याचे सांगितले जाते. त्यांना आज बाबासाहेबांबद्दल प्रेम येत आहे. त्यांना लोकसभेत जाण्यापासून रोखताना आणि निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव करताना हे प्रेम कोठे गेले होते, असाही सवाल दानवे यांनी यावेळी केला.