पुणे, ता. २३, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला हद्दपार करून विकासाचे राजकारण करण्यासाठी पुणेकरांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. तो आम्ही सार्थकी लावू . भारतीय जनता पक्षाचा हा महाविजय कार्यकर्त्यांचा आहे. अंगमेहनत करून त्यांनी दाखविलेल्या निष्ठेचा आहे. पुणेकरांनी विकासाला कौल दिला आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे निकाल जाहीर झाल्यावर प्रतिकिया देताना ते बोलत होते.
केन्द्रात, राज्यात आणि आता पालिकेत सर्वत्र जनाधार मिळाल्याने सर्वांना बरोबर घेऊन आम्ही पुण्याचा सर्वांगीण विकास करू. असे आश्वासन देऊन बापट यांनी पुणेकरांचे आभार मानले. ते म्हणाले, लोकसभा, विधानसभा, १० नगरपरिषदा पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, उल्हासनगर, अमरावती, अकोला, सोलापूर या महानगरपालिकांमध्येही त्यांचा ‘अच्छे दिन’ आलेत. मुंबईत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेनं पुन्हा एकदा स्पष्टपणे नाकारलं आहे. या सर्वच निकालाने मी अतिशय आनंदी व समाधानी आहे.
ते पुढे म्हणाले की, पुणेकरांनी आम्हाला राज्यात व केंन्द्रात मंत्रीपदे दिली. आमदार खासदारपदही दिले परंतु आजपर्यंत पुण्याचे महापौरपद दिले नव्हते. ते यावेळी देऊ केले आहे. त्याबद्दल मी पुणेकरांना जाहीरपणे धन्यवाद देत आहे. पुण्यात आणि पिपंरी चिचंवडमध्ये भारतीय जनता पक्ष नंबर वन ठरला आहे. त्यामुळे मेट्रोसह, विकास आराखड्याची अंमलबजावणी, चोवीस तास पाणी, नदी सुधारणा, कचरामुक्त पुणे, रिंगरोडची पूर्तता, स्मार्ट पुणे यासारख्या अनेक योजना मार्गी लावणे सोपे झाले आहे. पाच वर्षांपूर्वी जेमतेम १२.४८ टक्के पुणेकरांनी आम्हाला साथ दिली होती. पालिकेत आम्ही चौथ्या क्रमांकावर होतो. विधानसभा निवडणुकीत आमची विजयी घोडदौड सुरु झाली. त्यावेळी ४१.३७ टक्के पुणेकर आमच्या पाठीशी राहिले. विशेषत: युवकांनी भाजपाला उचलून धरले आहे. पालिकेच्या ताज्या निकालामुळे आम्ही जनमताचे शिखर गाठले असून आमची जबाबदारी आता वाढली आहे.
बापट पुढे म्हणाले की, मतदारांना सामोरे जातांना आम्ही सतत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केलेल्या प्रगतीचा आलेख त्यांच्यासमोर मांडला. परंतु विरोधकांनी मात्र सातत्याने नकारात्मक मुद्दे प्रचारात आणले.आम्हाला बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला. गुंडांची पार्टी म्हणून आमची अवहेलना केली. सभा फ्लाॅप झाल्याचा कांगावा केला. जाहीरनामा चोरल्याचा आरोप केला. सिंहगडावर झालेल्या शपथविधीवर हल्लाबोल केला. अनवधानाने केलेल्या विधानाबाबतची व्हिडीओ क्लिप व्हायरल केली. समंजस पुणेकरांनी या टीकेला मतपेटीद्वारे उत्तर दिले आहे. ” कारभारी बदला पुणे बदलेल ” या आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.