मुंबई- भारतीय जना पक्षातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. मागील सहा वेळेपासून भाजपाकडून मुक्ताईनगरातून निवडून येणाऱ्या खडसेंना भाजपच्या दुसऱ्या यादीतही तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपची पहिली यादी जाहीर झाली, त्यात अनेकांची नावे होती. पण, त्यात एकनाथ खडसेंचे नाव नसल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर त्यांचे नाव दुसऱ्या यादीत येईल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार पक्षाने त्यांचा पत्ता कट केल्याचे दिसत आहे. खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कालपासून रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव म्हणजे, एकनाथ खडसे. पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजना यांच्यासोबत काम केलेले एकनाथ खडसे यांना मागील 3 वर्षांपासून मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यांच्यावर जमीन बळकावल्याचा आणि दाऊदशी संपर्क असल्याचा आरोप करण्यात आला होता. खडसे या सर्व आरोपातून मुक्त झाले, पण त्यांच्या नशिबी दुय्यम वागणुक आली. यात अनेकांना वाटले होते की, त्यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही, तरी दुसऱ्या यादीत नक्की येईल. पण आता त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
खडसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज- दरम्यान, एकनाथ खडसेंनी आपले नाव उमेदवारी यादीत नव्हते, तरीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी एक भाजपकडून आणि एक अपक्ष, असे दोन अर्ज दाखल केले. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, “यादीत नाव असो की नसो, याबाबत चिंता नाही. पुढील यादीत माझे नाव असेल…पक्षासाठी 42 वर्षे मी प्रामाणिकपणे काम केले व यापुढेही पक्षात राहून काम करीत राहणार. पहिल्या यादीत माझे नाव नाही, यात माझा काय गुन्हा? माझा कोणताही दोष नसताना तीन वर्षे मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. तेव्हा मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता व आजही केलेला नाही. याबाबत मी पक्षातील वरिष्ठांकडे जाब विचारणार आहे.” यावेळी खडसेंनी उपस्थित जनतेला तुम्ही माझ्यासोबत आहात का? असा प्रश्न विचारला. दरम्यान, खडसे यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात एक भाजपतर्फे तर एक अपक्ष अर्ज होता.
“25 वर्षे झाली, मी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि इतर मोठ्या नेत्यांसोबत मिळून आम्ही निर्णय घ्यायचो. तिकीटवाटपाच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता. राज्यभरात युती तोडण्याची घोषणा असेल किंवा भाजपने ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या त्या मी पार पाडत आलेलो आहे. आता या गोष्टीला फक्त ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणता येईल.”