नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदय विकाराच्या धक्कानं निधन झालं आहे. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ६७ वर्षांच्या होत्या.
मोदी सरकार १ मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. इराक च्या धुमश्चक्री मध्ये अडकलेल्या असंख्य भारतीय मजुरांना मायदेशी परतण्यासाठी पुण्यातील पत्रकार शरद लोणकर यांनी केलेल्या विनंतीवर (मेल द्वारे ) त्यांनी तातडीने कार्यवाही करून कोलकाता , चेन्नई आणि महाराष्ट्रातील लातूर च्या युवक मजुरांची जातीने लक्ष घालून सुटका करवून त्यांना मायदेशी परत आणण्याची भूमिका पार पाडली होती .
दरम्यान आज तीन तासांपूर्वीच स्वराज यांनी ट्विट करुन काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. या क्षणाची मी आयुष्यभर वाट पाहत होते, असं स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळातच स्वराज यांची प्रकृती नाजूक असल्याचं वृत्त आलं. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्षवर्धन त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर थोड्या वेळातच त्यांचं निधन झालं.
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांनी मोदी सरकार-१ मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं. जगभरातील भारतीयांना त्यांनी अतिशय तत्परतेनं मदत केली. त्याशिवाय पाकिस्तानसह अनेक देशातील रहिवाशांना त्यांनी माणुसकीच्या नात्यानं वेळोवेळी सहाय्य केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या कायम मदतीसाठी तत्पर असायच्या. त्यांच्यातील संवेदनशीलतेचा अनुभव अनेकदा आला होता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी मागील लोकसभा निवडणूक लढवली नाही. याबद्दलची घोषणा त्यांनी मागील नोव्हेंबर महिन्यात केली होती.