पुणे-कोथरूड मतदार संघात चंद्रकांत दादा पाटील यांना भाजपने उमेदवारी दिल्याने ब्राम्हण -मराठा अशी भेदाभेद अजिबात नसून याबाबत च्या अशा वृत्ताचे जोरदार खंडन भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि याच मतदार संघातील उमेदवारीसाठी असलेले 1 इच्छुक संदीप खर्डेकर यांनी केले आहे . आठ दहा लोकांचे मत म्हणजे तमाम ब्राम्हण समाजाचे मत होत नाही हे कृपया माध्यमांनी ध्यानात घ्यायला हवे असे ते म्हणाले .
त्यांनी असे म्हटले आहे कि ,’मी व नगरसेविका सौ.मंजुश्री ने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती, आम्ही गेली ३ दशक प्रामाणिकपणे करत असलेले पक्षकार्य आणि व्यापक जनसंपर्क हा आमच्या उमेदवारीचा बेस होता….अद्याप पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही,पण वृत्तपत्रे,इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर आज सकाळपासून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे वृत्त व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली – प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने याचे विश्लेषण करु लागला आणि प्रतिक्रियांचा महापूरच आला…..आम्ही मात्र अतिशय निर्विकारपणे सर्व घडामोडींकडे बघत होतो, जर पक्षाने निर्णय घेतला असेल तर तो पूर्ण विचाराअंतीच याबाबत आमच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती.आम्ही निष्ठेने पक्षकार्यात सक्रिय आहोत आणि पक्षाने आम्हाला भरभरून दिले आहे.माझे नेते गोपीनाथराव मुंडे म्हणायचे की पार्टी नेहमी अन्यायच करते – म्हणजे काय तर कोथरूड मधून आम्ही १४ इच्छुक ,यापैकी कोणालाही तिकीट दिले असते तर उर्वरित १३ जणांना व त्यांच्या समर्थकांना तो त्यांच्यावरील अन्याय वाटला असता नाही का ??
संदीप खर्डेकर यांनी असेही म्हटले आहे की ,आज ह्या चर्चेच्या निमित्ताने काहींनी त्यांचा जातीयवादाचा मुद्दा ही गरम केला – मी स्वतः ब्राह्मण असून मला ही माझ्या ब्राह्मण असण्याचा अभिमान आहे – पण हा मुद्दाच येथे गैरलागू आहे , यापूर्वी एकीकृत शिवाजीनगर आणि कोथरूड मधून दोनदा शशीकांत सुतार तर दोन वेळा विनायक निम्हण आणि एकदा चंद्रकांत मोकाटे असे ५ टर्म मराठा उमेदवार निवडून आले आहेत …. माझा समाज विचारी आहे …. त्याला असे व्यक्तिगत स्वार्थातून किंवा व्यक्तिगत आकसातून केली गेलेली विधाने निश्चितच समजतात – आणि मग ८/१० लोकांचे मत हे ब्राह्मण समाजाचे मत होत नाही….
चंद्रकांतदादा पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ,संघ अधिकारी, अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेचे प्रचारक ,पदवीधर मतदारसंघाचे निर्वाचित आमदार ,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री,भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्या विविध पदांवर कार्यरत राहिले आहेत – त्यांच्या उमेदवारीचा निर्णय पूर्ण विचाराअंतीच झाला असणार.