सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे हे दोन्ही राजे भाजपमध्ये आले. पण येताना त्यांनी कोणतीही अट घातली नाही. मात्र, त्यांनी फक्त जनतेच्या कामांची यादी दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच छत्रपतींनी विनंती करायची नसते तर आदेश द्यायचा असतो, असेही ते म्हणाले.
छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, आदेश द्यायचा-मुख्यमंत्री
साताऱ्यात आलेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत. त्यांनी आदेश द्यायचा. त्यांचा आदेश आम्ही मावळे पाळणार आहोत. आपण जनतेचे सेवक आहोत. आपण केलेली कामांच्या माहिती देण्यासाठी फिरत आहोत. आता कोणी पैलवानच नाही. तर तुम्ही का यात्रा काढताय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यावर ते म्हणाले, आता लोकांचे म्हणणे ऐकण्यासाठी यात्रा काढली जात आहे. मागील पाच वर्षांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठिशी राहण्याचे काम केले. शेतकरी अडचणी आला तेव्हा आम्ही त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
तसेच ते पुढे म्हणाले, 18 हजार गावापर्यंत पिण्याच्या पाण्याचे काम आम्ही केले. 10 हजार किमीचे महामार्ग आमच्या सरकारने केले. बेघरांना 2 वर्षांत घर देण्याचे काम आता आम्ही करणार आहोत.