बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी सासवड येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. या वेळी कांचन कुल, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
कुल म्हणाल्या, ‘पुरंदरची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे. इथे लग्नासाठी कोणी मुली देत नव्हते. ती ओळख आता युती सरकारने पुसली असून, जलयुक्त शिवारसारखी कामे, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, गुंजवणी प्रकल्प शिवतारे यांच्या माध्यमातून केला आहे. कुल कुटुंब नेहमी बंड करण्यासाठी परिचित आहे. माझ्या उमेदवारीचे हे बंडच आहे. त्यात मी यशस्वी होणार आहे.’
‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,’ अशी शिफारसही आम्ही केंद्राकडे केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
‘पुरंदर’साठी आकर्षक पॅकेज
‘पुरंदरमधील नियोजित छत्रपती संभाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प ‘समृद्धी’प्रमाणे शेतकरी-जमीन मालकांशी चर्चा करूनच पूर्ण करणार आहे. त्याचे आकर्षक पॅकेज आणि जमीन संपादनासाठी लागणारी तरतूदही केली आहे. हे विमानतळ म्हणजे पुरंदरच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली ठरणार आहे,’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुरंदर विमानतळाबाबत भाष्य केले.
‘जेजुरीचा २५० कोटींचा आराखडा’
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीचा विकास करण्यासाठी सरकारने २५० कोटींचा तीर्थक्षेत्र आराखडा तयार केला आहे. आचारसंहिता असल्याने बोलणे योग्य नाही. पण खंडेरायाचा आशीर्वाद आम्ही मिळवणार आहोत, तसेच ६५०० हेक्टर जमिनीवर जेजुरी ‘एमआयडीसी’चे विस्तारीकरण होऊ घातले आहे. त्यामुळे शेकडो आंतरराष्ट्रीय उद्योग येथे येत आहेत. त्याचा फायदा स्थानिक भूमिपुत्रांना होणार आहे. सासवड शहराची ५८ कोटी रुपये खर्चाची भुयारी भूमिगत गटार योजना दोन्ही काँग्रेसची सत्ता असताना १५ वर्षांत मंजूर केली नाही. ती मी पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांच्या रेट्यामुळे मंजूर केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.